Raj thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'शेतकरी पण लाडका...' सरकारवर खोचक टीका करत राज ठाकरेंनी केली 'ही' मागणी!

Rashmi Mane

Mahayuti Government : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं तसेच 'गणपतीच्या सणाच्या काळात लवकर भरपाई द्या',असे आवाहनही सरकारला केले आहे. 'शेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावं,' अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

'गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारला केली आहे. तसेच राज ठाकरेंनी मनसैनिकांना शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या ट्विटवरून म्हटलंय की, मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !अशा भाषेत त्यांच्या खास शैलीत शा‍ब्दिक टोलेबाजी केली आहे.

तसेच, या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं.

दरम्यान, मराठवाड्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाले दुखडी भरून वाहु लागले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणांतील पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळे धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT