Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. त्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 18 जूनला पोटनिवडणूक होणार होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्या जागेसाठी सोमवारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या दिलेल्या मुदतीत महायतीकडून केवळ एकमेव अर्ज दाखल झाला.
महाविकास आघाडीकडून कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या सहा जागांप्रमाणे आता राज्यसभेच्या या एकमेव जागेवर प्रफुल पटेलांच्या निकटवर्तीयाची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
राज्यसभेच्या राज्यातील एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक राहिला असताना रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित पार पडली. त्यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भुजबळ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राज्यसभेसाठी यावेळी बैठकीत इच्छुक असलेल्या विजयसिंह पंडित, राजेंद्र जैन यांना बोलाविण्यात आले. त्यानंतर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.
रविवारी रात्री उमेदवाराच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राजेंद्र जैन यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे नेते मंत्री आशिष शेलार, छगन भुजबळ, भरत गोगावले यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यासह महायुतीचे नेतेमंडळी उपस्थित होते.
दुसरीकडे या एकमेव जागेसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असली तरी महाविकास आघाडीकडून कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे येत्या काळात राज्यसभेच्या या एकमेव जागेवर प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्याची अधिकृत घोषणा कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणुका जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास सहा जागांची निवडणूक बिनविरोध करीत महायुतीने बाजी मारली आहे. विशेषतः महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध निवडून आलाय आहेत.
त्यामध्ये अहिल्यानगर, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे, रायगड-रत्नागिरी, ठाणे-पालघर, यवतमाळ या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यानंतर आता आठ दिवसातच विधानपरिषदेप्रमाणेच राज्यसभेची एकमेव जागी आता राष्ट्रवादीही बिनविरोधचा गुलाल उधळणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारच रिंगणात उतरविण्याचे जिगर दाखवले नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.