Raosaheb Danve-Uddhav Thackeray-Rahul Gandhi-Kharge Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Leader Raosaheb Danve : मातोश्रीवर निर्णय घेणारे ठाकरे आता राहुल गांधींच्या दारात..

Jagdish Pansare

BJP Political News : हिंदूहद्सम्राट बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील सगळे राजकीय निर्णय हे मातोश्रीवर घ्यायचे. कोणत्याही पक्षाचा नेता हा बोलण्यासाठी मातोश्रीवर जायचा. पण 2019 मध्ये राज्यातील जनतेने दिलेला जनादेश झुगारून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांची काय अवस्था झाली आहे?

मातोश्रीवर निर्णय घेणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या दारात जात आहेत, अशा शब्दात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राज्यातील विधानभा निवडणुकीसाठी आमचा पक्ष कोकण सोडून संपुर्ण राज्यात अॅक्टिव्ह मोडवर असल्याचेही दानवे म्हणाले. माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली उडवली.

बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीवरील रुबाब त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी घालवला. राज्यातले शिवसेनेचे महत्वाचे निर्णय याच मातोश्रीवर व्हायचे, पण भाजपसोबत गद्दारी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता दिल्लीत राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या दारात जावे लागत आहे. मी किती चांगला मुख्यमंत्री आहे हे सांगावे लागत आहे.

पण ते किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्या मित्रांनीच त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे, असा टोला रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुस्तकाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांना लगावला. या पुस्तकात उद्धव ठाकरे एकदाच मंत्रालयात आल्याचा उल्लेख असल्याची आठवण करून देत दानवे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनतेचा जनाधार नाकारला होता, अशी खोचक टीका दानवे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विरोधी पक्ष यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही, असा विश्वास व्यक्त करत दानवे यांनी विरोधकांना सुनावले. राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या कल्याणाच्या योजना आणल्या, पण विरोधक त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, पण त्यात विरोधक आडकाठी आणू पाहत आहे, अशी टीका दानवे यांनी यावेळी केली.

बांगलादेशातील हिंदूवर अन्याय झाल्याच्या विरोधकांच्या आरोपवर केंद्रातील सरकारचे यावर बारकाईने लक्ष आहे, हिंदूंना कोणत्याही प्रकारचा त्रास सरकार होऊ देणार नाही, असे दानवे यांनी सांगितले. तुमच्या राजकीय पुनर्वसनाचे काय? असा प्रश्न विचारला त्यावर मी विधान परिषद, विधानसभा, राज्यसभेवर जाणार नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल, यावर तो निर्णय आमच्या पक्षाच्या पार्लामेंटरी बोर्डाचा असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT