Nawab Malik-sameer wankhede Sarkarnama
महाराष्ट्र

मी आधीच सांगत होतो, समीर वानखेडे तोडपाणी करणारा माणूस आहे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यातीत पंच किरण गोसावी (Kiran Gosawi) याच्या बॉडीगार्डचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आर्यन खानला एनसीबीच्या (NCB) कार्यालयात नेल्यानंतर काही तासांनी किरण गोसावी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मॅनेजरला भेटला होता. यावेळी त्यांच्यात एक डील झाल्याचा खुलासा गोसावीच्या बॉडीगार्डने केला आहे. या डीलमधील पैसे वानखेडे यांनाही जाणार होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपण या सगळ्या गोष्टी आधीच सांगत होतो, समीर वानखेडे तोडपाणी आणि दहशत निर्माण करणारा आहे असे म्हंटले आहे.

ज्या पद्धतीने आता बातम्या समोर येत आहेत त्या धक्कादायक आहेत. पण मी पहिल्या दिवसापासून या प्रकरणात प्रश्न उपस्थित करत होतो. आपण या सगळ्या गोष्टी आधीच सांगत होतो, समीर वानखेडे तोडपाणी आणि दहशत निर्माण करणारा आहे, ते खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. बॉलिवूडवर दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे. आता तर त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे. या लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेची दखल घेऊन त्यांची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. याबाबत मी मागणी करणार आहे. उद्या रात्री मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

त्यांचाच पंच बोलत आहे :

गोसावी आणि भानुशाली हे आधीपासूनच यांच्या संपर्कात होते. या दोघांच्या बाबतीत खुलासा झाल्यानंतर व्हिडीओ काढल्यानंतर एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पीसी घेतली होती. त्यावेळी त्यांनी नऊ लोकांची नावे घेतली होती. त्यातील हा पहिल्या नंबरचा पंच आहे. पंच यांनीच आणले. पंच यांनीच ठरवले. तो गोसावीची बॉडीगार्ड आहे. त्याने गौप्यस्फोट केल्यानंतर हे षडयंत्र सांगत आहेत. आमचं म्हणणं आहे चौकशी होऊ द्या. त्यात सर्व बाहेर येईल. हेच नाही इतर लोकांकडूनही यांनी पैसे घेतले आहेत. तेही हळूहळू बाहेर येतील. बोलू शकतील, असेही मलिक म्हणाले.

तर यावर भाजपने देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले, नवाब मलिक यांच्या वानखेडेंना जेलमध्ये टाकणार असल्याच्या वक्तव्यानंतर ४८ तासांच्या आतच प्रभाकरचे आरोप समोर आले आहेत. काय संबंध या दोघांचा? महाविकास आघाडीचे नेते पहाडासारखे ड्रग्ज माफियांचे अप्रत्यक्षपणे समर्थन का करत आहेत? की वाझे सारखी हप्ता वसुली तिथेही सुरु आहे? नेमके खर काय? प्रभाकरला सगळे माहित होते तर तो २२ दिवस गप्प का होता? असे अनेक सवाल कदम यांनी केले आहेत. आणि या प्रश्नांची उत्तर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावी अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT