Devendra Fadnavis - Ajit Pawar
Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut News: ''...तर फडणवीस-अजित पवारांचं सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं!''; राऊतांचं प्रत्युत्तर

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी शरद पवारांशी पहाटेच्या शपथविधी अगोदर बोलणं झालं होतं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला शरद पवार यांची संमती होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचवेळी आता संजय राऊतांनीही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच हे सरकार चाललं असतं, 72 तासांत कोसळलं नसतं. पण अलिकडे देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या प्रमुख नेत्यांची वक्तव्य पाहत आहे.

त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे जगातलं 10 आश्चर्य आहे. कारण दिल्लीत दोन आश्चर्य बसली आहेत अशी टीका राऊत यांनी केला आहे. सहा महिन्यांपूर्वी 40 आमदारांचा महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तोही शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरुन झाला असंही फडणवीस सांगू शकतात असा चिमटाही राऊतांनी फडणवीसांना काढला आहे.

मुख्यमंत्रीपदाबात तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला आहे.माणसाने किती खोटं बोलावं याला मर्यादा असतात. देवेंद्र फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वत: अमित शाहांसमोर काय बोलले होते? अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे ठरले होते. सत्तेचं फिप्टी फिप्टी वाटप त्यांनी मान्य केलं होतं असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

त्यामुळे स्वत:च विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काहीही अर्थ नाही. जर या शपथविधीला शरद पवारांची मान्यता असती, तर ते सरकार पाच वर्ष चाललं असतं असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यातून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी ते खोटी वक्तव्य करत असल्याचा निशाणा राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची संमती होती असा गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.

तसेच अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता असंही फडणवीसांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT