Jitendra Awhad Vs Mohan Bhagwat Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad Vs Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी, असं काय म्हटलं? अन् जितेंद्र आव्हाड झाले आक्रमक...

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोधावरून केलेल्या विधानावरून राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. मोहन भागवत यांनी छत्रपतींची समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधल्याचं म्हटलं.

मोहन भागवत यांनी केलेल्या या उल्लेखावर आता वातावरण तापू लागलं असून, टीका देखील होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड मोहन भागवत यांनी केलेल्या या उल्लेखावर चांगलेच आक्रमक झालेत.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत (RSS) मोहन भागवत यांच्या उल्लेखावर चांगलेच भडकलेत. मोहन भागवत यांचा इतिहास म्हणजे, विकृतीकरण आहे, असा थेट हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. याशिवाय मनुवादी विचारसरणीवर देखील जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दात प्रहार केलेत.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

"छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यावेळी महात्मा फुलेंनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रास दिला होता. पण या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी व्यवस्थित करून घेतली, ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच!", असे म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुवादावर पुन्हा एकदा हल्ला चढवला.

इतिहासाच्या कुठल्याही पानांवर उल्लेखच नाही

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या इतिहासावर देखील जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली, असा उल्लेख मोहन भागवत यांनी केला होता. पण तसं इतिहासाच्या कुठल्याही पानावर तसं लिहिलेलं नाही, याकडे लक्ष वेधताना आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो, असा सणसणीत टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

महायुती भाजप सरकारची डोकेदुखी वाढली

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग इथल्या मालवणच्या राजकोट किल्ल्याजवळ कोसळण्यावरून महायुती भाजप सरकारला महाविकास आघाडीसह राज्यातील शिवप्रेमी संघटनांनी घेरलं होतं. यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या शोधकार्यावर वाद निर्माण होईल, असं भाष्य केल्याने विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यातील महायुती भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT