Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News: '...म्हणून लोकांचा मूड दिसतोय की, काही झालं तरी राज्यात परिवर्तन करायचं' ; शरद पवारांचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Sharad Pawar on Maharashtra Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मोठ्याप्रमाणात राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष राज्यभर आपली ताकद वाढण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाकडूनही अशाच हालचाली सुरू आहेत. दरम्यान एका पत्रकारपरिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, राज्यातील जनतेला आता परिवर्तन हवं आहे, असं विधान केलं.

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, 'निवडणुका दीड-दोन महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. लोकसभेची निवडणूक झाली. निवडणुकीसाठी देशात एक वेगळं चित्र निर्माण होईल, असं एक वातावरण सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून केलं जात होतं. त्यांनी चारशे पेक्षाही अधिक जागा मिळतील अशाप्रकारची भूमिका ठिकठिकाणी मांडली होती. परंतु जनमानस वेगळाच होता. त्याची प्रचिती, सरकार मोदींचं सत्तेवर आलं पण स्वत:च्या ताकदीवर आलं नाही. अन्य दोन पक्षांची मदत त्यांना घ्यावी लागली आणि त्या शक्तीने बहुमत सिद्ध करण्याचं काम त्यांनी केलं.'

तसेच 'मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत(Vidhan Sabha Election) ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीला जनतेने विजयी केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवं आहे. ही परिस्थिती लोकसभेची होती. आता विधानसभेची निवडणूक आली आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रांताध्यक्ष फिरत आहेत, अन्य सहकारी फिरत आहेत. जनमताचा अंदाजही घेत आहेत आणि ठिकठिकाणी हेच चित्र दिसतय की, लोकांना बदल पाहिजे.' असं शरद पवार म्हणाले.

याशिवाय 'एखादा दुसरा गंभीर प्रसंग आला. तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचं उदाहरण काल आपण बदलापूरात बघितलं. एक दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडला, पण त्याची प्रतिक्रिया ही प्रचंड झाली. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, रेल्वे प्रवास थांबवतात याचा अर्थ एकच आहे, की लोकांमध्ये अस्वस्थता भयंकर आहे.' असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर 'याचा अर्थ एकच आहे लोकसभेच्यावेळी लोकांनी एक शांतप्रकारे क्रांती केली. शांत बसून संयमाने ३१ जागा विजयी केल्या. याचं महत्त्वाचं कारण लोकांना बदल हवा आहे. आता राज्याची निवडणूक आहे आणि म्हणून लोकांचा मूड दिसतोय की, काही झालं तरी राज्यात परिवर्तन करायचं. हे परिवर्तन करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस(Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष या सगळ्यांनी एकत्रित जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, लोक मोठ्याप्रमाणात साथ देतील,शक्ती देतील.' असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT