Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांना पुन्हा पक्षात जागा असेल का..? शरद पवार म्हणाले, 'तो निर्णय मी नाही तर...'

Deepak Kulkarni

Pune News : शिंदे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीच्या आदल्याच दिवशी त्यांनी बारामतीत पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

त्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत पवारांची भेट घेतली होती.त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानात आता शरद पवारांनी अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर मोजक्याच शब्दात उत्तर देत विषय संपवला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे.विधान परिषदेच्या निकालानंतर एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहे, तर दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

यावर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) पुण्यात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विधान परिषदेतील मविआची कामगिरी, शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव,राज ठाकरे, छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटीवर भाष्य केले.

एक वर्षांपूर्वी बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) घरात जागा आहे का असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केला.यावर त्यांनी अगदी रोखठोक आणि तितक्याच सफाईदारपणे उत्तर दिले.नुसते उत्तर दिले नाही तर आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अजित पवारांच्या 'घरवापसी'बाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले..?

खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजितदादांसाठी घरात जागा आहे का? असा सवाल केला. त्यावर पवार म्हणाले, घरात सर्वांनाच जागा आहे. त्यानंतर पवारांना पक्षात अजितदादांना जागा असेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता पवारांनी पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार.घ्यायचं की नाही हे ते ठरवतील, असं शरद पवार यांनी स्पष्टच सांगून टाकलं.पुढं त्यांनी गुगली टाकत जर त्यांनी घ्यायचं ठरवलं तर... पण ह्या सगळ्या जर तर आहे अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

बारामतीत माझा संवाद चांगलाय...

घरातील उमेदवार समोर असूनही सुप्रियाला बारामतीत मतदान केल्याशिवाय लोकं राहणार नाही हे मला माहिती होतं.त्यामुळे घरातला उमेदवार असूनही सुप्रियाला बारामतीत 40 हजार मतं जास्त पडली. त्याचं कारण माझा आणि मतदारांमधला सुसंवाद चांगला आहे.

पवार म्हणाले, तुमचा बारामतीतील लोकांशी वर्षानुवर्षाचा संवाद कसा आहे,हे महत्त्वाचं आहे.लोकांशी पर्सनल संवाद ठेवला तर लोकं तुम्हांला विसरत नाही.पूर्वी 50 टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. मतदार आल्यावर त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखतो. हा जनरेशन गॅप आहे. पण हा संवाद ठेवला तर लोक विसरत नाहीत, असं ठाम मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT