Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Unseasonal Rain : ''आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नव्हते,पण...'' ; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच कांदा, सोयाबीन, कापसाच्या कोसळलेल्या दरानं संकटात सापडलेल्या बळीराजाला आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावरुनच शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उमटण्याची शक्यता आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी महाजन म्हणाले, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचं आश्वासनही मंत्री महाजन यांनी दिले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्येच या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असंही यावेळी ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार(MVA) असताना शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळत नव्हती. मात्र आता राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आणि या दोन्हीही सरकाराकडून लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विचार करतील असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला आहे.

'' महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते..''

महाविकास आघाडीच्या सरकावर हल्लाबोल करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना मदत देताना ती योग्य वेळेतही मिळत नव्हती. त्याचबरोबर ती नुकसान झाल्यानंतरही पिकांचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे याबाबत मविआ गंभीर नव्हते असा चिमटाही महाजन यांनी विरोधकांना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT