महाराष्ट्र

Shiv Sena Split : शिवसेनेत पुन्हा फूट? पुन्हा बंडाची शक्यता; बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा खासदारांचा दावा

Shiv Sena internal rebellion 2026 : शिवसेनेत पुन्हा अंतर्गत बंडाचे वारे? खासदारांचा दावा—बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Rashmi Mane

शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. बंड, फूट आणि पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

संजय राऊत यांनी दावा केला आहे की उदय सामंत हे मोठ्या गटासह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दावोस येथे झालेल्या दौऱ्यादरम्यान यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा झाल्याचंही त्यांनी सूचित केलं. “उदय सामंत भाजपच्या वाटेवर आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. दावोस मध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अनेकांना आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत समीकरणांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावरूनही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. सामंत म्हणाले होते की अंबादास दानवे यांची शिवसेनेत येण्याची तयारी सुरू आहे. “मी माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. आमच्याकडे येण्याचे प्रयत्न सुरू असून, काही दिवसांत ते आमच्यासोबत असतील,” असं सामंत यांनी सांगितलं.

या दाव्याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे शिंदे गटात जाणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं राऊत म्हणाले. "अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही सोयीसाठी पक्ष बदललेला नाही. जिथे सत्ता तिथे जाण्याची त्यांची भूमिका कधीच राहिलेली नाही,” असं स्पष्ट मत राऊत यांनी मांडलं. त्यांनी सामंतांवर अप्रत्यक्षपणे टीकाही केली आणि भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर लक्ष वेधलं.

या घडामोडींमुळे शिवसेनेतील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. एकीकडे भाजप प्रवेशाच्या चर्चांनी खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत आहेत. अंबादास दानवे यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवांवरूनही ठाकरे गट अस्वस्थ नसून, हे सर्व राजकीय दबाव तंत्र असल्याचा दावा केला जात आहे.

एकूणच, शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का, नव्या बंडाची नांदी आहे का, की हे केवळ आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण आहे, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचं वातावरण तयार झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT