<div class="paragraphs"><p>Bullock cart race&nbsp;</p></div>

Bullock cart race 

 

Facebook

महाराष्ट्र

शर्यतीची बारी बसली : शेतकऱ्यांची एकजूट आणि बैलगाडा मालकांचा विजय!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) पुन्हा एकदा सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरूवारी शर्यंतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या बंदी उठवण्याच्या संघर्षाला यश आले आहे. मात्र शर्यतीसाठी काही अटी-शर्ती घालण्यात आल्या असून त्यानुसारच शर्यती पार पाडव्या लागणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी "बैलगाडा शर्यतीची बारी बसली : शेतकऱ्यांची एकजूट आणि बैलगाडा मालकांचा विजय" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजीराव अढळराव पाटील ((Shivajirao Adhalrao Patil) यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहीले आहे की, तब्बल ८ वर्षांपूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन राज्य सरकारविरोधात बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरु व्हाव्यात यासाठी माझ्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेला यश येऊन शर्यतीवरील बंदी उठविण्यात आपल्याला यश आली होती. या दिवशी झालेल्या निर्णयाच्या आधारे सर्व बैलगाडा मालक, शौकिनांना मोठा दिलासा मिळून सुमारे १५ महिने ७ मे २०१४ पर्यंत बैलगाडा शर्यती अविरत व निर्विघ्नपणे सुरु राहिल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा आपल्या विरोधात निकाल जाऊन बैलगाडा शर्यतींवर बंदी आली.

त्यानंतर देखील माझा याविषयीचा पाठपुरावा थांबला नाही. केवळ न्यायालयीन लढाईच नव्हे तर लोकसभेत मी सातत्याने याविषयी आवाज उठवत तब्बल ६ वेळा आग्रही भूमिका मांडत बैलगाडा शर्यती कायमस्वरूपी सुरु राहाव्यात यासाठी लोकसभेत २०१४ ते २०१९ या कालावधीत आग्रही मागणी राहिली. खाजगी विधेयक मांडले. त्याच अनुषंगाने मी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अनिल माधव दवे, डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पाठपुरावा केला. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्राणीक्रूरता कायद्यात २०१६ मध्ये दुरुस्तीचे राजपत्र पारित केले, असेही अढळराव पाटील म्हणाले.

मात्र हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निर्णयास प्राणी मित्र संघटनेकडून आव्हान दिले गेले व केवळ ५ दिवसात न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती कायद्याच्या कचाट्यात अडकल्या होत्या. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैलगाडा मालकांची महत्वपूर्ण समन्वय बैठक घेतली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडण्याचा शब्द दिला होता.

आज तो शब्द खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत बैलगाडा मालकांच्या व शेतकऱ्यांच्या आनंदाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या यशामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीमुळे बैलगाडा मालकांची पुन्हा एकदा बारी बसली असून भिर्रर्रची आरोळी आसमंनात घुमली आहे. या निर्णयामुळे माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आहे याचा आंनद व मनस्वी समाधान वाटत आहे, अशीही प्रतिक्रिया अढळराव पाटील यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT