Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsene : ठाकरे-शिंदे एकत्र येणार; संजय शिरसाट काय बोलून गेले?

Jagdish Patil

Mumbai News, 10 June : शिंदेंच्या बंडापासून आजवरच्या साऱ्या सभा, मेळावे बैठका, पक्षाचे कार्यक्रम आणि अगदी मीडियाच्या बाइटमध्येही ठाकरेंविरोधात चढा आवाज ठेवणाऱ्या शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाटांना अचानक ठाकरेंबाबत उमाळा आला. 'ठाकरे-शिंदेंच्या वाटा वेगळ्या असल्या, तरीही दोघे एकत्र येऊ शकतील, असे संकेत देऊन शिरसाटांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

'ठाकरेंनी 'स्टॅटर्जी' बदल्यानंतर हे होऊ शकतो, असा सल्लाही शिरसाटांनी ठाकरेंना दिला. आता मुळात भाजपसोबत न जाण्याची आणि दोन्ही काँग्रेस आघाडी ठाकरेंकडून तुटण्याची कुठची शक्यता नाही. तरीही, शिरसाटांनी नवे विधान करून दोन्ही शिवसेनेच्या (Shivsena) वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

सत्तेत राहूनही लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानेच ठाकरेंसोबत जुळवून घेण्याबाबतची गुगली शिरसाटांनी टाकली असावी. 'पण, गद्दारांना पुन्हा मातोश्रीची पायरी चढू न देण्याची भूमिका घेतलेले ठाकरेंचे नेते काय बोलणार, याचीही उत्सुकता आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, मोदींच्या शपथविधीनंतर एनडीएमधील 70 खासदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश होता. या सहापैकी शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रिपद आलं आहे. यावरुनच आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे.

शिंदेंच्या नकली शिवसेनेच्या तोंडावर एक मंत्रीपद फेकून मारलं असल्याची बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अशातच आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर एक बॅनर लावण्यात आलं आहे. ज्यावर लिहिलं आहे, "शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा", या बॅनवरुन आता चांगलच राजकारण सुरु आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटानेही याबाबत प्रतिक्रिया दिली. या संदर्भात बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता भविष्यात हे दोन्ही गट एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिरसाट?

संजय शिरसाट म्हणाले, "ठाकरे आणि शिंदे गटाच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. एक गट एका दिशेला तर दुसरा गट दुसऱ्या दिशेला आहे. मात्र, दिशा बदलून एकाच दिशेला आले तर निश्चितच स्वागत केलं जाईल. परंतु आता त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकेकाळी शिवसेनाप्रमुख हे आमचं दैवत आहेत, असं सगळे म्हणायचे. मात्र, आता काही लोक शरद पवार-राहुल गांधींना दैवत म्हणायला लागले आहेत, याचा आम्हाला त्रास होतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांची स्टॅटर्जी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही."

शिरसाटांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. शिवसैनिकांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. मात्र, ज्यांनी पक्षफोडीचं मोठं कट कारस्थान रचलं आणि शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका खाईत लोटण्याचा प्रयत्न केला, अशा कपटी आणि कारस्थांनी लोकांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT