Sunil Tatkare And Ajit Pawar : अजित पवार राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. महायुतीत त्यांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. लोकसभेला आणि आता पुढे येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत अजितदादांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विशेष करून विधानसभेला अजितदादांचा महत्त्वाचा वाटा असेल.
"राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीसाठी त्यांची भूमिका निर्णायक भूमिका राहणार असल्याने काही हितशत्रूंचे पोटशूळ उठले आहेत. तेच बदनामी करत आहेत. तसे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले. भाजपमधील (BJP) काहींनी याचे खापर अजितदादांवर फोडण्यास सुरवात केली आहे. अजितदादांना भाजप महायुतीत घेऊन चुकीचे केले. विधानसभेला महायुतीत भाजप आणि शिवसेनाच हवी, असा सूर अवळला जातोय. यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट वेगळा पडणार असल्याच्या चर्चा रंगला आहे.
भाजपकडे लोकसभेत कोणी काम केले आणि कोणी नाही, याचे अहवाल दिले जात आहे. यातून अजितदादांविरोधात सूर अवळला जात आहे. यामुळे महायुतीत अस्वस्थता पसरली असून अजितदादांची विधानसभेला नेमकी भूमिका कशी असेल, याकडे लक्ष लागले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हितशत्रूंकडून अजितदादांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, असा आरोप केला.
सुनील तटकरे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघांमध्ये असूनही युतीचे उमेदवार पिछाडीवर गेले आहेत. याबाबत भाजपकडे सादर झालेल्या अहवाल पाहू. त्यानंतर त्यावर विश्लेषण करू. मात्र राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असलेल्या अनेक ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आघाडी मिळाली आहे. त्याचे काय?" यातून एकच दिसते, अजितदादांना बदनाम करण्याचा हेतू दिसतो आहे. हितशत्रूकडून जाणीवपूर्वक तसे प्रयत्न केले जात आहेत. भाजप पक्षाकडून अजून तरी, कुठलाही आरोप आमच्यावर झालेला नाही. महायुतीतील कुठल्याही नेत्याची, अशी भूमिका अद्याप तरी आमच्या समोर आली नसल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
सोलापूर, माढा आणि दिंडोरीसारख्या मतदारसंघात आम्ही जोमाने काम केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने देखील महायुतीतील प्रत्येक मित्रपक्षासाठी काम केले. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून संविधानाबद्दल अपप्रचार केला. महायुतीविषयी अल्पसंख्याक समाजाबद्दल असुरक्षितता निर्माण करण्यात महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी झाला.त्यामुळे देशात आणि राज्यात महायुती पिछाडीवर गेली. या मुख्य कारणावर भाजपने देखील बोलले आहे. यात अजितदादांचा कुठे संबंध येतो?, असा सवाल खासदार सुनील तटकरे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.