सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांपुढे आता ‘टीईटी’ पात्रता परीक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नोकरी टिकवण्यासाठी पुढील दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सुमारे 7469 शिक्षकांवर टांगती तलवार कायम आहे. शासन आणि न्यायालयाच्या आदेशांमुळे शिक्षकांना आता मर्यादित संधी उपलब्ध असून त्या संधींचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 2775 शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सुमारे 8700 शिक्षक काम करत आहेत. मात्र त्यापैकी केवळ 1231 शिक्षकच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण झालेले आहेत. उर्वरित सुमारे 7469 शिक्षक अजूनही ही परीक्षा पास झालेले नाहीत. त्यामुळे येत्या काळात या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अत्यावश्यक झाले आहे.
2013 पूर्वी शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य नव्हती. त्यामुळे त्या काळात अनेक शिक्षक शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरीत रुजू झाले. मात्र शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी नंतर टीईटीची अट लागू करण्यात आली. त्यानंतर या अटीबाबत अनेक वर्षे वाद सुरू होते. अखेर 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत 53 वर्षांखालील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले. न्यायालयाने यासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे.
या निर्णयामुळे आता हजारो शिक्षकांना ठरलेल्या कालावधीत परीक्षा पास करावी लागणार आहे. जर त्यांनी ही अट पूर्ण केली नाही, तर त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांमध्ये सध्या मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी एकूण 6 संधी मिळणार आहेत. चालू वर्षात जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रत्येकी परीक्षा होणार आहेत. त्यानंतर 2027 पर्यंत आणखी काही परीक्षा घेतल्या जातील. या सर्व संधींचा लाभ घेऊन शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या 38 शाळांमध्ये सध्या नियमित मुख्याध्यापक नाहीत. तसेच टीईटीची अट असल्यामुळे अनेक शिक्षकांना पदोन्नतीही देता आलेली नाही. केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदांसाठी टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची गरज असते. मात्र पात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने प्रशासनाला अडचणी येत आहेत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाला पाठवण्यात आली आहे. ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे, अशा सर्व शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात शिक्षकांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.