Maharashtra MLC News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी १ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पूर्वी ठाणे आणि पालघर हे दोन्ही एकत्र जिल्हे होते तेव्हापासून या मतदारसंघाचे नाव ठाणे असेच आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवा जिल्हा वेगळा करण्यात आला. मात्र मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आणि मतदार तेच राहिले.
या मतदारसंघात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, वसई-विरार आणि उल्हासनगर अशा तब्बल ७ महानगरपालिका, ७ नगरपालिका, ६ नगरपंचायती ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांचे निवडून आलेले सदस्य (लोकप्रतिनिधी) मतदान करतात.
त्यानुसार आजघडीला या मतदारसंघात अंदाजे १०३० मतदार आहेत. पण सध्या ठाणे आणि पालघर या जिल्हा परिषदांची निवडणूक झाली नसल्याने केवळ नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका इथलेच नगरसेवक मतदान करणार आहेत.
या मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास एकसंध शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड मिळवली होती.
२०१० च्या दशकापर्यंत हा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या काळात नेहमी शिवसेनेच्या वाट्याला जायचा आणि शिवसेना येथे सहज बाजी मारायची. राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नाईक यांच्या माध्यमातून अनेकदा आव्हाने उभी केली, मात्र शिवसेनेचे पारडे नेहमी जड राहिले.
या मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात गाजलेली आणि प्रतिष्ठेची निवडणूक जून २०१६ मध्ये पार पडली. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ठाण्याचे बडे नेते आणि तत्कालीन ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांना रिंगणात उतरवले होते.
या निवडणुकीत तब्बल १,०१८ मतदारांनी मतदान केले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत रवींद्र फाटक यांनी तब्बल ६०१ मते मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला, तर वसंत डावखरे यांना केवळ ३४० मतांवर समाधान मानावे लागले. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता.
रवींद्र फाटक यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२२ रोजी संपला. तेव्हापासून ही जागा रिक्तच होती. आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकाही पार पडल्या आहेत. त्यानंतर इथल्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेनेमधील कांटे की टक्कर पुन्हा चर्चेत आली आहे.
गत सहा महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये बराच वाद झाला होता. भाजपने शिवसेनेतून आयात केलेले नेते, स्थानिक पातळीवर शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी आखलेली रणनीती, आक्रमक भाषणे आणि जोरदार प्रचार यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती.
आता ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्षांतील संख्याबळाची लढत पुन्हा चर्चेत आली आहे. या मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतांचे संख्याबळ असून, शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप स्पष्टपणे वरचढ ठरत आहे. भाजपला मागे टाकून इथे विजय मिळवायचा असल्यास शिवसेनेसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
इथे बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते असून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. शिवाय काँग्रेसकडे ४७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ३८, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २९ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १८ मते आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रत्येकी ६, एमआयएम ५, कोनार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, अपक्ष ९ मते असून ही मतेही निर्णायक ठरू शकतात.
जवळपास ३ वर्षे ११ महिन्यांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पुन्हा माजी आमदार रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे. तर नुकताच राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आनंद परांजपे यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे भाजपचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. मात्र, अद्याप भाजपकडून इच्छुकांचे नाव समोर आले नसले तरी या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.