

Dharashiv News : राज्यातील रिक्त असलेल्या 17 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामध्ये 75 टक्के पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा समावेश आहे. बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नसताना या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे.
2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व नसतानाही विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात फोडाफोडी करीत भाजपचे सुरेश धस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 72 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजप गड राखण्याची शक्यता वाटत असतानाच महाविकास आघाडीनेही तगडा उमेदवार मैदानात उतरविण्याचे प्लॅनींग केले असल्याने या निवडणुकीतही गेल्या वेळेस प्रमाणे पुन्हा एकदा चुरस पाहावयास मिळणार आहे.
धाराशिव-बीड-लातूर जिल्हयातील संख्याबळ पाहता याठिकाणी महायुतीमधील भाजपचे एक हाती वर्चस्व दिसून येत आहे. त्याशिवाय 2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावरील भाजपचा (BJP) दावा कायम आहे. धाराशिव, बीड व लातूर या तीन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थित भाजप या मतदारसंघावर दावा सोडणार नाही. लातूर, धाराशिव जिल्हा परिषद आणि तीन जिल्ह्यातील 18 नगरपालिका व सहा नगर पंचायतीपैकी बहुतांश ठिकाणी भाजपच्या ताब्यात आहेत.
या मतदारसंघातील तीन ही जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणत इतर पक्षांमधून इनकमिंग झाले आहे. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काही बडे चेहरे या दोन्ही पक्षात दाखल झाले आहेत. विधान परिषदेच्या या एका जागेवर इच्छूकांची संख्या अधिक असल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
भाजपकडून या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये भाजपकडून माजी आमदार बसवराज पाटील, धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अर्चना पाटील-चाकूरकर यांची नावे चर्चेत आहे. यावेळेस या मतदारसंघावर धाराशिव जिल्ह्याचा दावा अधिक असणार आहे. तर महाविकास आघाडीनेही तगडा उमेदवार मैदानात उतरविण्याचे प्लॅनींग केले आहे. त्यानुसार गेल्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले आमदार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.
त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश धस बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असताना अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठींबा दिला होता. विशेषतः या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने असताना त्याठिकाणी 100 ते 125 मतदार भाजपने फोडून चमत्कार घडवला होता. त्यावेळेस चुरशीने लढत देणाऱ्या अशोक जगदाळे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे काँग्रेसचे प्लॅनींग असल्याचे समजते.
महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असले तरी गेल्या वेळेस चुरशीची लढत देणाऱ्या जगदाळेंना पुन्हा निवडणुकीत उतरवण्याचा डाव काँग्रेस टाकणार असल्याचे समजते. विशेषतः गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे असलेली जागा निवडणुकीच्या तोंडावर अदलाबदल करून राष्ट्रवादीने त्यांच्याकडे घेतली होती. मात्र, यावेळेस संख्याबळानुसार ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यातच काँग्रेस नेते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या सोबतची अशोक जगदाळे यांची जवळीकता पाहता काँग्रेसकडून पुन्हा त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता अधिक आहे.
धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघाचा इतिहास पाहता या ठिकाणी 1994 मध्ये काँग्रेसकडून नरेंद्र बोरगावकर विजयी झाले होते. त्यानंतर 2000, 2006 व 2012 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांनी हॅट्ट्रिक केली होती. तर त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडत अदलाबदल करण्यात आली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोडून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतर या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पाहवयास मिळाल्या होत्या. ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी नाचक्की झाली होती. या निवडणुकीत त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष अशोक जगदाळे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत जोरदार चुरस पाहावयास मिळाली होती. या निवडणुकीत जगदाळे यांना 452 मते पडली होती तर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 525 मते मिळाली होती.
मतदार संघातील तीनही जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. केवळ बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या नाहीत. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने त्यांच्या 75 टक्के सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीची घोषणा केली आहे.
बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य वगळता धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात एकूण 881 मतदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सध्यस्थितीत या ठिकाणी महायुतीमधील भाजपचे प्राबल्य दिसून येत आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.