MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
महाराष्ट्र

Mp Imtiaz Jaleel News : मराठा आरक्षणाचे आंदोलन दिल्लीपर्यंत न येऊ देण्याचे भाजप नेत्यांना होते आदेश...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाची चर्चा दिल्लीतही झाली. मुख्यमंत्री एकनथा शिंदे जेव्हा जरांगे यांचे उपोषण सोडवायला गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या भाषणातही याचा उल्लेख केला होता. दिल्लीत ` अरे वो जरांगे पाटील कोण है`, असं लोक मला विचारत होते, असेही शिंदे यांनी सांगितले होते. (Maharashtra News) पण याच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलन महाराष्ट्रातच रोखा, ते दिल्लीपर्यंत येऊ देऊ नका, असे स्पष्ट आदेश राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतून देण्यात आले होते, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर आज महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याला नौटंकी म्हणणाऱ्यांनाही इम्तियाज यांनी खडसावले. पाटील यांनी आपला राजीनामा पक्षाच्या नेत्याकडे दिला असता तर त्याला नौटंकी म्हणता आले असते, पण त्यांनी तो लोकसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

त्यामुळे मराठा आरक्षणासाठी त्यांच्या भावना किती तीव्र आहेत, हे लक्षात येते, असे म्हणत त्यांचे समर्थन केले. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहाेचू नये, यासाठी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांची बैठक घेतली होती. कुठल्याही परिस्थिती मराठा आरक्षणाचे आंदोलन महाराष्ट्रातच रोखा, ते दिल्लीपर्यंत येता कामा नये, असे स्पष्ट आदेश राज्यातील नेत्यांना देण्यात आले होते. भाजपच्या महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना हे विचारा, असे आव्हानही इम्तियाज यांनी या वेळी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिल्लीशी निगडित आहे, त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न मार्गी काढला पाहिजे. महिला आरक्षण जे कदाचित २०२९ मध्येही मिळेल की नाही? माहीत नाही, पण त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन पंतप्रधान मोदींनी बोलावले होते, मग मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन का बोलवत नाही? असा सवालही त्यांनी केला. हेमंत पाटील आणि आमच्या पक्षात मतभेद आहेत, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी त्यांच्यासोबत असल्याचे इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे, पण दिल्लीत संसदेचे अधिवेशन बोलावून त्यातच आरक्षणाचा तिढा सुटू शकेल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दिल्लीत मराठा आरक्षणाचे आंदोलन पोहाेचू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी राज्यातील आमदार, खासदारांनी आता दिल्लीत धडक देऊन इथे आंदोलन सुरू करावे, तसे झाले तरच केंद्र सरकारला जाग येईल, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT