Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Narayan Rane News : '...तर एकहीजण घरापर्यंत पोहोचला नसता'; इतिहास सांगत नारायण राणेंनी भरला दम

Sachin Waghmare

Sindhudurg News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ऐन पावसाळ्यात कोसळला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत आहेत. त्यातच बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला त्याठिकाणाला भेट दिली. या भेटीवेळी राणे समर्थक व ठाकरे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे दोन्ही गटात मोठा राडा झाला. त्यानंतर नारायण राणे यांनी विरोधकांवर आरोप केले.

या राड्यानंतर पत्रकार परिषद घेत नारायण राणे (Narayan Rane) यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी राणे व ठाकरे गटात झालेल्या राड्याबद्दल काही पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले, 'आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असते तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?' अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

नारायण राणे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवद्रोही असल्याचा आरोप आमच्यावर आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी काय बोलणार ? असे म्हणत त्यांनी स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या पैशाने उभारला असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्त्व हे म्हणजे पैसे कमावण्याचे साधन आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारला आहे का? त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. त्यांना बोलता येत नाही. शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणसाठी काय केले? कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या, किती प्रकल्प आणले, किती पूल बांधले, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. विरोधकांकडून केवळ राज्य सरकारवर टीका करण्याचे काम केले जात आहे. बाहेरून येत कोकणात आंदोलन करीत केवळ महायुती सरकारवर टीका करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात असलेली टीका राणे यांनी केली.

आदित्य ठाकरे हे आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला, असे सांगत आहेत. पण राड्यामुळेच शिवसेना नावारुपाला आली. तेव्हा आदित्य ठाकरे शेंबडा होता, उद्धव ठाकरेंनाही काही माहिती नव्हते, ते इकडे नव्हते, अशा शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT