Dharashiv News : मराठवाड्याला पावसाचा तडाखा बसल्यानं तेथील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आता राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर आता शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंही मराठवाड्याच्या पूरस्थिती,नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) सर्वात मोठा गंभीर आरोप केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी(ता.25) धाराशिवमधील पारगावमध्ये पूरस्थिती आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच यावेळी ठाकरेंनी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींनी स्वत: तेथील 75 लाख महिलांच्या खात्यात 10000 जमा केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकार लाडक्या बहिणींवर 45000 कोटी रुपये खर्च करत असल्याच्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला. त्यांनी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले जात आहे, त्या दीड हजार रुपयांत लाडक्या बहिणींचं कुटुंब सावरलं जाणार आहे का असा संतप्त सवालही केला.
तसेच मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात जमीन खरडून गेल्या आहेत, पिकं सडून गेलीत, घरंदारं वाहून गेलीत, गुरं, शेळ्या-मेंढ्या वाहून गेल्या आहेत.शेतीच नाही,तर इथल्या शेतकऱ्याचं आणि आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलं आहे. त्यांनाही मदत मिळणं गरजेचं आहे,असंही ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारनं देऊ केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. एकरी साडेतीन ते चार हजार रुपयांची ही मदत खूपच कमी आहे. झालेलं नुकसानीचं साफसफाई करण्यासाठी यापेक्षा दुप्पट खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारनं थेट सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही ठाकरेंनी उचलून धरली. यावेळी त्यांनी आमच्या सरकारनं कोरोनाच्या काळातही सरसकट कर्जमाफी दिल्याची आठवणही ठाकरेंनी यावेळी करुन दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं माझा स्वभाव नाही. पण आम्ही केलेल्या कर्जमुक्तीचीच आता गरज आहे. मुख्यमंत्री म्हणतात, योग्यवेळी आम्ही कर्जमाफी करु, म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यावर 2019 ला कर्जमाफी ज्याप्रमाणे कर्जमाफी करताना अटी टाकल्या होत्या.त्यावेळी शेतकऱी म्हणालेला, याच्यापेक्षा एकवेळ गळफास लावून घेतो, तुमची कर्जमाफी नको. पण माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे, आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत असल्याचा शब्दही ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
केंद्र सरकारनं मराठवाड्यासाठी मदत केली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्यावी. कोरोनाच्या काळात पीएम केअर फंड निर्माण केला होता, त्याचा मायबाप कोण आहे हे अजूनही कळत नसल्याची टीकाही त्यांनी केली. पण कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडात जमा केले गेले. पंतप्रधानांनी पीएम केअर फंडाचा वापर आता करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी किंवा हेक्टरी 50 हजार रुपये द्यावेत, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी यावेळी लावून धरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.