Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे चिंतन शिबिरासाठी नागपूरला आले असता त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला होता. याची नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव हाजी सोहेल पटेल यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. चिंतन शिबिर आटोपताच त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. अजितदादा (Ajit Pawar) जे बोलले, त्याच भावना मी व्यक्त केल्या. माझे काय चुकले?, असा सवाल त्यांनी केला आहे.
सोहेल पटेल सुमारे वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांच्यासोबत तेसुद्धा पक्षात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सुनील तटकरे आदल्या दिवशीच नागपूरमध्ये दाखल झाले होते.
तत्पूर्वी, त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काराल्यात बोलावले होते. त्यांच्यासोबत चर्चा करायची असल्याचा निरोप त्यांनी पाठवला होता. मात्र पत्रकार परिषद आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
सोहेल पटेल आपल्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना घेऊन आले होते. त्यांच्या अडचणी सांगायच्या होत्या. मात्र, तटकरे भेटले नसल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, तटकरेसाहेबांनी निरोप दिल्यामुळे आम्ही सर्व कामधंदे सोडून आलो. ते भेटतील, दहा मिनिटे चर्चा करतील अशी आशा आम्हाला होती. पक्ष आमचे ऐकतो हा संदेश या माध्यमातून जनतेत जाईल. यासाठी मी अनेक लोकांना घेऊन आलो होते. त्यांना त्यांच्या समस्या व अडचणी तटकरे यांना सांगायच्या होत्या.
नागपूरमध्ये मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र नागपूर व विदर्भातील एकाही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. मुंबईतून आलेल्या एका इव्हेंट कंपनीला सर्व कामे देण्यात आले होते. मात्र, इव्हेंट कंपनी पक्ष चालवू शकत नाही.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहे. जनतेत मिसळण्याची व कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची ही संधी होती. मात्र, सभागृहाचे दारे लावून चिंतन शिबिर घेण्यात आले. अजितदादा यांनी आपल्या भाषणात जनतेत मिसळा, त्यांच्या समस्या जाणून घ्या पक्ष तळागाळापर्यंत न्या, असा सल्ला सर्वांना दिला.
पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी टाळणाऱ्या मंत्री व पालकमंत्री यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. आमचीसुद्धा हीच मागणी होती. मात्र, माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझे काय चुकले. दादा जे बोलले तेच मी बोललो.आम्ही काही राजकरण करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी येथे आलो नव्हतो. विदर्भात फक्त गटबाजी सुरू आहे. एकाकडे गेलो, तर दुसरा नाराज होते. मग आम्ही बोलायचे कोणासोबत, समस्या कोणाला सांगायच्या, असा प्रश्नही सोहेल पटेल यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.