Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Decision: उद्धव ठाकरेंनी का नाकारली विधानपरिषदेची आमदारकी? मोठं कारण आले समोर; शिवसेनेचा पुढचा प्लॅन काय असणार..?

Ambadas Danve nomination News : महाविकास आघाडीतील घटक पक्षाने ही त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरतील व पुहा आमदार होतील, असे वाटत होते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची मुदत 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे पुन्हा लढतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षाने ही त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरतील व पुहा आमदार होतील, असे वाटत होते. मात्र, ऐन शेवटच्या क्षणी त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत निष्ठावंत शिवसैनिक अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ठाकरेंनी विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्या मागचे मोठे कारण समोर आले असून येत्या काळात त्यांची रणनीती काय असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागासाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारीच भाजपने (BJP) सहा उमदेवार जाहीर करून बाजी मारली आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत होती. उद्धव ठाकरे उमेदवारीबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली होती. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी केला जात असलेला आग्रह सोडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी नाकारण्याचे कारण समोर आले आहे. येत्या काळात ठाकरे हे राज्यतील पक्षसंघटना बांधणीसाठी वेळ देणार आहेत. येत्या काळात तीन वर्षापर्यंत राज्यात एकही मोठी निवडणूक नाही. त्यामुळे विधान परिषदेवर जाऊन फारसा फायदा होईल, असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे येत्या काळात पक्ष संघटनेसाठी वेळ मिळावा अशी त्यांची भूमिका असल्याचे दिसत आहे.

त्याशिवाय सेनेत पक्षांतर्गत नाराजी देखील आहे. गेल्या काही दिवसापासून नाराजीमुळेच ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे, अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे, त्यामुळे ही गळती रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री होते, तसेच त्याच काळात आदित्य ठाकरे हे मंत्री होते, त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री झाले, मुलाला मंत्री केले, असे आरोपही त्यावेळी झाले होते. त्यामुळे येत्या काळात हे सर्व आरोप खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा आहे.

एकेकाळी मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पकड मजबूत करण्यासाठी अंबादास दानवे यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली असल्याचे समजते. दानवे हे मराठवाड्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळेच येत्या काळात सेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी आमदारकी नाकारली असल्याची चर्चा रंगली आहे.

SCROLL FOR NEXT