Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला पुन्हा एकदा मोठा हादरा देणारं बंड शिवसेनेत झालं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांना 'जय महाराष्ट्र' केल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पहिल्या बंडावेळी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक व निष्ठावंत खासदार म्हणून राज्यात ओळख असलेल्या धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचंही नाव फुटलेल्या खासदारांमध्ये आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता शिवसेनेतील दुसरं बंड तसेच ओमराजेंच्या बंडखोरीच्या चर्चांवर त्यांचे जिवलग मित्र व कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेतील पहिल्या बंडावेळी जे दोन आमदार गुजरातमधून परत फिरले होते त्यात धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील आणि अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश आहे. या दोन्ही आमदारांच्या प्रतिक्रियांवरुन ठाकरेंच्या शिवसेनेत सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर तीव्र संतापाची लाट उसळल्याचा प्रत्यय येत आहे.
सुषमा अंधारेंनी धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क केला होता. त्यावेळी ओमराजेंच्या बंडाबाबत बोलताना म्हणाले, ताई, मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यावरुन, ओमराजेंच्या फुटण्याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच, मी माझी गॅरंटी देऊ शकतो असं स्पष्ट करत त्यांनी ते आजही ठाकरेंसोबतच असल्याची ठाम भूमिकाही मांडली.
तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख म्हणाले, पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. निवडून आलेले आमदार-खासदार हे मोदी आणि भाजपच्या बळावर निवडून आलेले नसून ते सर्व उद्धव ठाकरेंचा फोटो वापरून निवडून आल्याचा टोलाही त्यांनी फुटणार्या खासदारांना लगावला आहे.
यावेळी नितीन देशमुख यांनी गंभीर आरोप करताना 'ऑपरेशन टायगर' हे फक्त माध्यमातूनच सुरू असल्याचं म्हटलं. तसेच यावेळी त्यांनी लवकरच ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही सांगितलं आहे. ते त्या भेटीत ठाकरेंना यापुढे पक्षाच्या खासदार आणि आमदारांच्या मताने पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी नेमू नका, हेच पदाधिकारी पुढे फुटणाऱ्या आमदारा-खासदारांसोबत पक्ष सोडून निघून जातात असा हल्लाबोल केला आहे.
अकोल्यातील आमदार नितीन देशमुखांनी यावेळी 'ऑपरेशन टायगर'चा दावा फेटाळून लावतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचा कोणताही आमदार आणि खासदार फुटणार नसल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. आपल्याला गुवाहाटीवरून परत आल्याची आयुष्यात कधीच खंत वाटली नसल्याचं सांगत त्या निर्णयाचा अभिमानच असल्याचंही देशमुख यांनी ठणकावून सांगितलं.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनाही इशारा दिला आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात चुकून शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला गेला तर त्याला एकनाथ शिंदेच सर्वस्वी जबाबदार असणार आहेत. त्यामुळे निर्माण होणारा होणारा मराठी माणसांचा संतापही शिंदेंना सहन करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर दोन आमदार चर्चेचा विषय ठरले होते त्यात धाराशिवमधील आमदार कैलास पाटील आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे होते.
कैलास पाटील हे एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांसह सुरतला जात असताना मधूनच माघारी फिरले होते. तर आधी शिंदेंसोबत गुवाहाटी गाठलेल्या नितीन देशमुखांनी नाट्यमयरीत्या तिथून परत मुंबई गाठली होती. ठाकरेंवर आपली निष्ठा व्यक्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.