Shivsena UBT on all-party delegation :आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खोटेपणाच बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर कसे गरजेचे होते, याबाबत संपूर्ण जगाला माहिती देण्यासाठी मोदी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारनं सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली असून त्यांच्यावर भारत-पाकच्या अलिकडच्या लष्करी संघर्षाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यावर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केंद्राच्या विविध देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचं आधी आवाहन केलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना धक्का देत सर्वपक्षीय शिष्टमंडळात आपलाही प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला अधिकृत एक्स हॅण्डलरवरून निर्णय जाहीर करत, भूमिका मांडली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की ‘’देशाच्या शत्रूंविरूद्ध आम्ही सर्व एक आहोत, आणि म्हणूनच भारताचं प्रतिनिधी मंडळ विविध देशांना भेट देत आहे त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सहभाग असेल. या प्रतिनिधी मंडळाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.’’
''हे प्रतिनिधी मंडळ “आतंकवादाविरोधात भारत” या उद्दिष्टासाठी असून, राजकारणासाठी नाही. याची खात्री मिळाल्यानंतर, आम्ही केंद्र सरकारला हेही स्पष्ट केलं की, देशाच्या हितासाठी जे योग्य आहे, ते आम्ही निश्चित करू. खासदार प्रियंका चतुर्वेदी या देशभरातील इतर खासदारांसोबत या प्रतिनिधी मंडळाचा भाग असतील.''
''पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या देशाच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे, विशेषतः पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांच्या विरोधात, आणि त्यांची केंद्र नष्ट करण्यासाठी. आपल्या सशस्त्र दलांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, यावर कोणतेही दुमत असू नये, हे सर्वपक्षीय मत आहे. पहलगामच्या घटनेतील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेतील अपयशाबाबत आमचं मत ठाम आहे, आणि देशाच्या हितासाठी आम्ही योग्य ते प्रश्न उपस्थित करत राहू. पण जागतिक स्तरावर पाकिस्तानप्रणीत दहशतवाद उघड करणे आणि त्याला वेगळे ठेवणे अत्यावश्यक आहे.''
याशिवाय''या प्रतिनिधी मंडळांबाबत पक्षांना योग्य माहिती दिली जावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती , जेणेकरून गोंधळ आणि गैरसमज टाळता येईल . काल झालेल्या चर्चेतून सर्व शंका दूर झाल्या आणि आम्ही देशहितासाठी अशा उपक्रमांना पूर्ण पाठिंबा असल्याचं पुनः स्पष्ट केलं आहे.'' असंही म्हटलं आहे.
तसेच, पहलगाम हल्ला ते ऑपरेशन सिंदूर या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलावण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व देशप्रेमी भारतमातेच्या रक्षणासाठी पूर्णपणे एकसंघ आहोत. जय हिंद!
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.