Jalgaon Corporation
Jalgaon Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिका आयुक्त बदलीची पडद्यामागची राजकीय खेळी?

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगाव महापालिका आयुक्तपदाचा सध्या खो-खोचा खेळ सुरू आहे. आयुक्तांची बदली ही प्रशासकीय बाब आहे. मात्र पडद्यामागे मोठी राजकीय खेळी सुरू असल्याची चर्चा आहे.

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची जळगावातील आयुक्तपदी नियुक्ती ही अचानक झाली होती. तत्कालीन आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जळगावला आयुक्तपदी कोण येणार? याची चर्चा सुरू होती. त्याच वेळी महापालिकेत अतिरिकत आयुक्तपदी असलेल्या डॉ.श्रीमती विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी कारभार होता. मात्र नवीन आयुक्त न आणता डॉ.श्रीमती गायकवाड यांनाच आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

विशेष म्हणजे राजकीयदृष्टया त्याला सर्वांचीच सहमती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे, तसेच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनीही हिरवा कंदील दिल्याचे सांगण्यात येत आहे.

नियुक्तीनंतर तब्बल सात महिने डॉ.श्रीमती गायकवाड यांनी काम केले. त्यांच्या कामाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. मध्यंतरी महापौर जयश्री महाजन यांच्याशी त्यांचे बिनसले असल्याची चर्चा होती. पुढे मात्र त्यांच्यातील जो अंतर्गत वाद संपला आणि त्याही एकमेकींच्या सहकार्याने काम करीत होत्या. त्याच वेळी महापालिकेत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावाचा वाद उफाळला.

त्यात शहर अभियंता व महापालिकेचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक यांच्यात संघर्ष झाला तो अद्यापही सुरूच आहे. मात्र या वादात आयुक्त डॉ.गायकवाड अलीप्तच राहिल्या. मात्र शहरातील रस्त्याच्या कामाच्या मुद्यावर आमदारांशी वाद झाल्याची चर्चा शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी काही प्रस्ताव दिले होते. त्यांनी त्याबाबत महापालिकेत येवून बैठकही घेतली होती. मात्र त्यानुसार निधीतून कामे झाले नाही, शहरातील रस्तेही झाले नाहीत, आयुक्त श्रीमती गायकवाड यांच्यामुळेच ही कामे झाले नाहीत, असा ठपका आमदार भोळे (MLA Bhole) यांनी आयुक्तावर ठेवला.

विशेष म्हणजे विधीमंडळात या विषयावर ताराकिंत प्रश्‍नही भोळे यांनी उपस्थित केला होता. परंतु यानंतरही आयुक्त व आमदार भोळे यांच्यात अंतर्गत वाद सुरूच होता. शहरातील रस्त्याची कामे झालेली नाहीत, नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे आमदार सुरेश भोळे आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्नशील असावेत, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या बदलीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचीही सहमती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आयुक्तांची बदली करण्याबाबत सहमत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांची बदली आणि त्या ठिकाणी होणारी नियुक्ती ही त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या मंजूरीशिवाय होवू शकत नाही असा अलीखीत नियम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाराजीत का होईना परंतु पालकमंत्री पाटील यांनी त्याला सहमती दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पुढे आयुक्ताच्या बदलीचे आदेश निघाले.

त्यानुसार त्यांनी पदभारही घेतला. यानंतर पुढे मात्र डावपेच अधिकच सुरू झाले बदली झालेल्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची बदली विरूध्द ‘मॅट’मध्ये याचिका दाखल केली, ‘मॅट’ने त्यांना स्थगिती दिली. याबाबतची माहिती मिळताच पदभार घेतलेले आयुक्त रजेवर गेले. दुपारी ते खासगी वाहनाने नांदेडकडे (Nanded) निघाले होते. त्याच वेळी सायंकाळी डॅा. गायकवाड पदभार घेणार होत्या. मात्र त्यांनी सकाळी पदभार घेण्याचे ठरविले. यानंतर मात्र घड्याळाप्रमाणे राजकीय काटेही फिरल्याचे सांगितले जाते.

नांदेडकडे निघालेले आयुक्त पवार (Pawar) यांना अजिंठा गावानजिक संदेश गेला आणि आणि त्यांनी आपले वाहन पुन्हा जळगावकडे वळविले असल्याची माहिती आहे. जळगावातील (Jalgaon) एका राजकीय नेत्याचा हा संदेश होता असेही सांगण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता श्रीमती गायकवाड येणार म्हणून महापालिकेतील अधिकारी सज्ज होते.

परंतु त्याऐवजी पवार आले आणि त्यांनी आपले कामही सुरू केले त्यामुळे सर्वच बुचकाळ्यात पडले, यात प्रशासनाचे स्थगितीचे कोणतेही आदेश नसल्यामुळे आपली एक दिवसाची रजा रद्द करून पवार यांनी पुन्हा पदभार घेतला आहे. तर श्रीमती गायकवाड या प्रशासनाकडून बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहे. सायंकाळी त्यांच्या स्थगितीचे आदेश येवून त्या पदभार घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत राजकीय डावपेच असल्याशिवाय प्रशासनात हे होवूच शकत नाही अशीही चर्चा आहे.

याबाबत आमदार भोळे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले, ''आयुक्ताबाबत आपली कोणतीही तक्रार नाही, कोणीही आयुक्तपदावर असले तर त्यानी आपले काम केले पाहिजे. कारण निधी आम्ही आणत असतो. त्यासाठी आम्हाला शासन दरबारी संघर्ष करावा लागतो. जनतेच्या कामासाठीच आमचे प्रयत्न असतात. परंतु रस्ते तसेच इतर काम होणार नसतील आम्ही आमची नाराजी व्यक्त करतोच मात्र तरीही कामे होत नसतील तर आम्हाला वरीष्ठ स्तरावरच सांगावेच लागते. त्यामुळे आपण विधीमंडळातही प्रश्‍न उपस्थित केला होता.

मात्र आयुक्तपदावर कोणीही असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु जनतेच्या काम करण्यास विलंब लावल्याबाबत जनतेची दिलगीरी व्यक्त करून आयुक्तांनी काम सुरू करावे, त्याला आपली कोणतीही हरकत नाही. आपण मात्र विकासासाठी निधी आणण्याचे कर्तव्य करणारच आहोत, असे मतही आमदार भोळे यांनी ‘सरकारनामा’ शी बोलतांना व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT