Eknath Shinde, Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP & Shivsena News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला खोटं बोलून जमवली माणसं ? जळगावातला धक्कादायक प्रकार समोर

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे जळगावातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, आत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरु असतानाच या सभेसाठी खोटं बोलून गर्दी जमवली जात असल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजप तसेच शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकप्रकारे दोन्ही पक्षाकडून शक्तिप्रदर्शनच करण्याचा प्रयत्न आहे. याचाच भाग या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यात येत आहे. मात्र, या सभेसाठी खोटं बोलून गर्दी जमवली जात असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेला जात असलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी त्यांना या कार्यक्रमाबाबत माहिती नसल्याचं समोर आलं. सभेला जाण्यासाठी बसमध्ये बसलेली सुमित्रा पाटील नावाची महिला म्हणाली, आम्ही जळगावला चाललो आहोत. ग्रामसेवक सांगत होता, तिथे घरकुलचा काहीतरी कार्यक्रम आहे. मला घरकुल मिळालेलं आहे. त्याठिकाणी मंत्री येणार आहे म्हणून आम्हाला बोलावलं आहे. पण काय कार्यक्रम आहे ते माहिती नाही.

दुसरे एक ज्येष्ठ नागरीक म्हणाले, आम्ही घरकुल मिळावं म्हणून जळगावच्या सभेला चाललो आहे. त्याठिकाणी ग्रामसेवक, तलाठी यांनी तिथं तुम्हांला घरकुल देऊ असं सांगितलं आहे. नंतर एक महिला म्हणाली, घरकुलमध्ये हप्ता बसला असल्यानं जळगावला कार्यक्रमाला चाललो आहे. या काही प्रतिक्रियानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला खोटं बोलून गर्दी जमवली जात आहे की काय असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

ही हुकूमशाही आहे की लोकशाही ? खडसेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे(Rohini Khadse) आणि काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार एकनाथ खडसेंनी सरकारवर टीका केली आहे. शासनाकडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे, काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावर देखील उभे नव्हते. ते सर्वजण राष्ट्रवादीच्या कार्यालयात होते. त्या ठिकाणी पोलिसांनी धूडगुस घालत कारवाई केली, महिलांना उचलून नेलं. ही हुकूमशाही आहे की लोकशाही? आता हजारो महिली स्वतः निषेध करणारचं आहेत तेव्हा तुम्ही काय करणार आहात असा सवाल एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी यावेळी केला.

तसेच पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना रोहिणी खडसे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एवढी दादागिरी कशी सहन करावी. आम्ही पश्र कार्यालयात शांततेत बसलेले होतो, आम्ही कुठली घोषणा देखील दिली नाही असंही खडसे म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT