Ahmednagar Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Political News : नगरमध्ये गुन्हेगारी टॉपवर; नेत्यांचं मात्र आपण भलं अन् राजकारण भलं

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : नगर शहरात खून, चोर्‍या, दरोडे, ताबेमारीचे प्रकार वाढत आहेत. त्यावर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. शहरातील व्यापारी दहशतीत आहेत. मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधींना या प्रश्नावर उपोषणाचा इशारा द्यावा लागला. यावरून लोकप्रतिनिधी किती हतबल झालेत किंवा ते राजकारणातच किती मग्न आहेत, हे समोर येते, अशा शब्दांत माजी महापौर व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहर-जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता निशाणा साधला.

नगर शहरासह जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती मांडण्यासाठी माजी महापौर कळमकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी इलेक्शन मोडमध्ये असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेकडील गंभीर प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कळमकरांनी (Abhishek Kalmalkar) केला.

फडणवीसांवरही निशाणा

कळमकर म्हणाले, "राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः वकील आहेत. त्यांच्या पक्षाच्या रचनेत ते अहमदनगर जिल्ह्याची धुरा सांभाळतात, अशीही माहिती आहे. पण नगर शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, ताबेमारीचे गुन्हे, खून, दरोडे अशा घटनांची त्यांनी कधीही गांभीर्याने दखल घेतली असे दिसले नाही. सत्ताधारी तीन पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी तर सध्या निवडणुकीच्या इव्हेंटमध्ये मग्न आहेत. एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी पोलिसांची कार्यपद्धती सुधारावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावतच आहे."

'सध्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावात जाऊन आश्वासनांची खैरात दिली जाते आहे. मात्र, यात कायदा-सुव्यवस्था राखून नगरकरांना दहशतमुक्त सुरक्षित जीवनाची हमी देण्याचा विसर सगळ्यांनाच पडत आहे, असा दावाही त्यांनी केला. शासकीय यंत्रणा व पोलिसांवर धाक असणे आणि त्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाचा व लोकप्रतिनिधींचा दबाव असणे आवश्यक आहे,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मागील आठवड्यात राहुरीतील आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून करण्यात आला. न्यायिक प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक असलेले वकीलही आता सुरक्षित राहिले नाहीत. या घटनेचे वकीलवर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत. न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील पोलिस दलाची कार्यपद्धती, गुन्हेगारांना वेसण घालण्यात येत असलेले अपयश अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह होणे गरजेचे आहे,' असेही अभिषेक कळमकर म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT