Aaditya Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरे म्हणतात, '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500...'

Deepak Kulkarni

Nashik News: लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला जबरदस्त फटका बसला होता.याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिंदे सरकारने मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली.या योजनेला सध्यातरी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

आता या योजनेची चांगलीच धास्ती महाविकास आघाडीने घेतली आहे.त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरुन मोठं राजकारण तापलं आहे.आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही लाडकी बहीण योजनेवरुन भाजपसह शिंदे गटाला डिवचलं आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात आमदार आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली.यावेळी त्यांनी जाहीर सभेत छगन भुजबळांसह महायुतीला सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच या सभेत ठाकरे म्हणाले, 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात ते 15 लाख देणार होते. आता 1500 वर आले आहेत असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आमचे सरकार येणार आहे. आम्ही लाडक्या बहि‍णींना पैसे वाढवून देणार आहोत. या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताच रक्कम वाढवून द्यावी असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी यावेळी सत्ताधारी महायुतीला दिले.

लोकसभेची मोठी लढाई आपण जिंकलो आहोत.पण राज्यात आपल्यावर आता खोके सरकार बसवले आहे.पण पुढे महाराष्ट्रात आपण आपलं सरकार निवडणार आहोत.मागील दोन वर्षांत एक तरी उद्योग राज्यात आला आहे का? स्पर्धा परीक्षांचा घोळ घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत.एका उपमुख्यमंत्र्यांकडे गेले की दुसरा नाराज होतो, खोके घेतले जातात अशी सडकून टीकाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांची मागणी छोटी आहे. दोन्ही परीक्षा एकाचवेळी हा हट्ट का? मागील वर्षीही तेच झाले होते. सत्ताधारी पक्ष, मंत्री या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत, असे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरेंनी येवल्यातील सभेत मंत्री छगन भुजबळांचाही समाचार घेतला. ते म्हणाले,येथे जे मंत्री आहेत, त्यांना कधी वाटले नाही का? जनतेला पाणी मिळावे. याठिकाणी अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखविले.उद्धव ठाकरेंनी निवडणूक नसताना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती करून दाखविली. कोरोनाकाळात सर्व बंद होते तरीही आपल्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देणं सुरू होतं असंही मत आदित्य ठाकरे यांनी या सभेत मांडलं.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी जळगावमधील एका कार्यक्रमात महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, महायुतीने राज्याला बदनाम केले आहे.मंत्रालयात घुसून या लोकांच्या खुर्च्या खाली करायला हव्यात. तशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणा, पण विधानसभा निवडणुकीत जनता बरोबर बटण दाबणार आहे असा दावा राऊतांनी यावेळी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT