Ahilyanagar Estimate Committee Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Estimate Committee Visit : 27 पैकी फक्त 7 आमदार, तरीही बैठकीत अनियमिततांवर बोट; अहिल्यानगरमध्ये आज विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

Committee flags irregularities, begins ground inspection of development projects : पहिल्याच बैठकीत कृषी, जलजीवन मिशन, वाळू उत्खनन आणि कर्जमुक्ती योजनांचा आढावा; संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्याची शक्यता

Pradeep Pendhare

Ahilyanagar Development Works : अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा गुरुवारपासून सुरू झाला.

प्रशासनाने या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असली, तरी समितीतील 27 आमदारांपैकी केवळ 7 सदस्यांनी पहिल्या दिवशी उपस्थिती लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पहिल्याच दिवशी झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत काही अनियमितता निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे समिती आज संबंधित विकासकामांची (Development) प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची तसेच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीत सर्वप्रथम कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी (Collector Office) डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणांतील पाणीसाठा तसेच संभाव्य टंचाईसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती समितीसमोर मांडली. जिल्ह्यात "पाहिजे त्याला शेततळे" आणि "वॉटर बँक" उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत विधानमंडळात प्रस्ताव मांडण्याची तयारी असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याशिवाय कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेत किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, त्यांना काही अडचणी आहेत का, याचीही समितीने माहिती घेतली.

अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज सुमारे 47 लाख लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती समितीने घेतली. दुग्ध व्यवसायासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, याविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली. या क्षेत्रातील अनुभव राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही उपयुक्त ठरू शकतो, असे समिती सदस्यांनी नमूद केले.

अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा गाजला

बैठकीत जिल्ह्यातील वाळू उत्खनन आणि वाहतुकीचाही मुद्दा उपस्थित झाला. प्रशासनाने वाळूपासून सुमारे पाच कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याची माहिती दिली. त्यावर समिती सदस्यांनी, "पाच कोटी रुपयांच्या महसुलासाठी ग्रामीण भागातील शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचे नुकसान होत असेल, तर त्याला पर्याय शोधला पाहिजे," असे मत व्यक्त केल्याचे समजते. वाळू वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था सुचविण्याचे आवाहनही करण्यात आल्याची माहिती आहे.

'अर्थपूर्ण' चर्चांवर समिती सदस्यांचा खुलासा

दौऱ्यापूर्वी काही सदस्यांच्या प्रतिनिधींनी विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. धुळे जिल्ह्यातील अशाच दौऱ्यादरम्यान रोकड सापडल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्येही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र, याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर समितीतील एका सदस्याने अशा चर्चांना कोणताही तथ्याधार नसल्याचे स्पष्ट करत, "या चर्चांमध्ये काहीही अर्थ नाही," अशी प्रतिक्रिया दिली.

जलजीवन मिशनवर एसआयटीबाबत प्रश्न

राज्यात चर्चेत असलेल्या जलजीवन मिशनमधील कथित अनियमिततेबाबत समितीने प्राथमिक माहिती घेतली. या प्रकरणात आतापर्यंत किती अधिकारी निलंबित झाले, अशी विचारणा करण्यात आली. प्रशासनाने दहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती दिल्यानंतर, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे का, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. त्यावर पोलिस प्रशासनाने अद्याप एसआयटीची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT