Flood-affected farmers survey Maharashtra : राज्यातील पूरस्थिती ओसरली असून, महसूल विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. पंचनामे करण्यासाठी महसूल विभाग नुकसानग्रस्त भागात फिरत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. पण पुराच्या पाण्यात साप, सरडे, पाली, मगरी, सुसर, कासव, असे सरपटणारे प्राणी वाहून आले आहेत.
पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या सापानं तलाठी आकाश काशिकेदार यांना चावा घेतला. ही घटना अहिल्यानगरच्या जामखेडमधील धनेगाव इथं घडली. सर्पदंश झालेले तलाठी काशिकेदार यांचा जीव शेतकऱ्यांनी रुग्णालयात दाखल करत वाचवला. या घटनेची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना मिळताच, त्यांनी सर्पदंश झालेले तलाठी काशिकेदार यांची भेट प्रकृतीची विचारपूस केली.
जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीने (Flood) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी आकाश काशिकेदार गेले होते. सकाळी आठ वाजल्यापासून ते पंचनामे करत परिसरात फिरत होते. शेतकरी सुहास काळे, संदिप काळे व प्रमोद काळे यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनाम्यासाठी जात असताना, त्यांना गवतातील सापाने दंश केला.
तलाठी काशिकेदार यांना सुरूवातीला काहीतरी टोचले असेल, म्हणून दुर्लक्ष केले. पण काही अंतर चालून गेल्यावर त्यांना भोवळ येऊ लागली. काही वेळानं ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) आजूबाजूला व्यवस्थित पाहिल्यावर तिथं त्यांना साप दिसला. तलाठी काशिकेदार यांना सर्पदंश झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्राथमिक उपचार करत, त्यांना उचलून घेत, गावाच्या दिशेने पळत आणले.
शेतातून धनेगावात येताना, कोल्हापूरचा मोठा बंधारा लागतो. तो पळतच शेतकऱ्यांनी ओलांडला अन् तलाठी काशिकेदार यांना वाहनाने जामखेड इथं नेले. तिथं खासगी रुग्णालयात तातडीने उपचार मिळाल्यानंतर तलाठी काशिकेदार यांची प्रकृती स्थिर झाली. या घटनेची माहिती मिळताच, विधान परिषेदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तलाठी काशिकेदार यांची भेट घेतली. तब्येतेची विचारपूस केली. तहसीलदार मच्छिंद्र पाडळे देखील यावेळी उपस्थित होते. राम शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य पार पडताना, प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं.
पुराच्या पाण्यासोबत चिखल, काडीकचरा, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भागात साचला आहे. तर सखल भागात अद्याप पुराचे पाणी साचले आहे. शेतामध्ये पाण्यासोबत वाहून आलेले ओंडके, झाडांच्या फांद्याही आहेत. यातच साप आणि विंचवाचे दर्शन होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नदी पात्रालगत असलेल्या गावांत, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सरपटणारे प्राणी वाहून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढील काळात या प्राण्यांकडून दंशाची भीती अधिक वाढली आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
नदीकाठी असलेल्या जनावरांच्या गोठ्यातही मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी आढळत आहे. ज्या ठिकाणी पुराचे पाणीही आले नाही, अशा घरांत देखील सरपटणारे प्राणी निघत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. त्यामुळे घरातील महिलावर्ग स्वच्छता करण्यास भीत आहे. स्वच्छता करत असताना कुठूनही दंश होण्याची भीती असल्याने स्वच्छतेचे मोठे आव्हान, आता पूर ओसरल्यानंतर निर्माण झाले आहे. याशिवाय अडगळीच्या ठिकाणी, जनावरांचे खाद्य ठेवलेल्या ठिकाणी सर्पांचेही दर्शन होत आहे. विंचू, सर्प यांच्या आश्रयस्थानात पुराचे पाणी शिरल्याने त्यांनी कोरड्या जागी स्थलांतर केले आहे. परिणामी त्यांचे सहज दर्शन मानवी वस्तीनजीक होताना आढळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.