
Ajit Pawar news : लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर पारनेरमधील सुपा औद्योगिक वसाहत चर्चेत आली. तिथल्या गुंडगिरीमुळे उद्योजक दबावाखाली आहेत, असे आरोप झाले. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप झाले.
उद्योजकांच्या याच मुद्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. परंतु उद्योजकांची अशी कोणतीही तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचलेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस कोणाविरोधात अॅक्शन घेणार? सुपा औद्योगिक वसाहतीत नेमकी कोणाची दहशत आहे? ही प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, पारनेर-सुपा औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) विविध विषयासंबंधी आढावा घेतला. आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम उपस्थित होते.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी, राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला सरकार प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य असून, पारनेर-सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश दिले. तसेच उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करावे, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर-सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलिस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी." औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलिस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले.
'सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे,' यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आयटीच्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.