Ahilyanagar BJP news : "संगमनेर, नेवासे व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये भाजपचे आमदार नाहीत. त्यामुळे तेथील जबाबदारी मी घेतो. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया व राजकारणाकडे दुर्लक्ष करावे.
कोण कोठे गेले, ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येण्याशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने काम करून सामन्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे", असा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अहिल्यानगर शहर आणि जिल्हा भाजपच्यावतीनं (BJP) आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार विक्रम पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, "काश्मीरमधील 370वे कलम रद्द होणे ही स्वातंत्र्यानंतरच्या 75वर्षांतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. आजपर्यंत भारतावर झालेल्या हल्ल्यांना भारताने कधी उत्तर दिले नाही. मात्र, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) विराजमान झाल्यापासून प्रत्येक हल्ल्याचा सडेतोड उत्तराने बदला घेतला आहे". असे प्रगल्भ इच्छाशक्ती असलेले पंतप्रधान देशाला लाभणे हे आपले भाग्य आहे. सेवा, सुशासन व गरिबी कल्याण या त्रिसूत्रीवर पूर्ण देशात काम केले जात असल्याचे मंत्री विखे यांनी म्हटले.
भाजपने योग्य रणनीती आणि लोकशाही मार्गाने विधानसभा निवडणुका जिंकल्यात. याच रणनीतीवर आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकायच्या आहेत. यासाठी तीनही जिल्हाध्यक्षांनी व नव्या मंडल अध्यक्षांनी आपल्या भागाचा दौरा करून मतदारसंघ पिंजून काढण्याच्या सूचना मंत्री विखे पाटलांनी दिल्या. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर राज्यात कधीही निवडणुका लागतील, असे संकेत देखील त्यांनी दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याला संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. या निवडणुकांसाठी पक्षाने सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हेमध्ये तुमचे नाव यावे यासाठी आपापल्या वॉर्डात, गटात व गणात मोर्चे बांधणी सुरू करा. सर्वेत जर तुमचे नाव आले, तर तुमचा विजय दूर नाही, असे यावेळी आमदार विक्रम पाचपुते सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.