Ahilyanagar news : पाथर्डीच्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रा रंगपंचमीला भरते. श्री चैतन्य कानिफनाथ यांचं संजीवनी समाधीस्थळ! हे स्थळ देशभरातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, 'भटक्यांची पंढरी' म्हणून ओळखले जाते. अशा या देवस्थान स्थळी जाती-पातीच्या धर्माच्या सर्व भिंती गळून पडतात.
असे असताना गेल्या दोन वर्षांपासून इथंल्या यात्रेला हिंदू-मुस्लिम भेदभावाचं गालबोट लागताना दिसत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मढी (ता. पाथर्डी) इथल्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतला आहे. सरपंच संजय मरकड यांनी ठराव जाहीर केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.
'भटक्यांची पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी इथल्या कानिफनाथ यात्रेवरून पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांना दुकानं लावू देणार नाही, या आपल्या जुन्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत पुन्हा आक्रमक झाली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी देखील ही भूमिका अधिकृतपणे जाहीर केली.
मढी ग्रामपंचायतीच्या यात्रेपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यात नवा वादाला तोंड फुटलं आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी इथं मोठी यात्रा भरते. परंतु गेल्या वर्षापासून या यात्रेला धार्मिक भेदाभावाच्या वादाचे ग्रहण लागलं आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला होता.
या निर्णयामुळे मोठा गदारोळ झाला होता आणि हे प्रकरण अखेर न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. न्यायालयाने (Court) यावर अद्याप कोणताही अंतिम निकाल दिलेला नसतानाही, यंदाच्या यात्रेसाठी ग्रामपंचायतीने तोच पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा प्रशासन पेचात पडलं आहे.
श्री चैतन्य कानिफनाथ यात्रेसाठी राज्यसह देशातून भाविक येतात. यातच पुन्हा एकदा धार्मिक भेदभावाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी ग्रामपंचायतीने पुन्हा घेतलेल्या ठरावावर भूमिका मांडली. ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावावर आम्ही ठाम आहोत. यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही.
परंतु सरपंच संजय मरकड यांच्या या भूमिकेवर आणि ग्रामपंचायतीच्या ठरावावर सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहे. हा निर्णय म्हणजे, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील बिघडलेल्या धार्मिक सलोख्याला आखणी चिथावणी देण्यासारखं आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या या ठरावावर थेट कारवाई करावी. न्यायालयाच्या निकाल जेव्हा येईल, तेव्हा त्याची अंमलबजावणी करावी.
या यात्रेत भटक्या विमुक्त समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहायला मिळतात. काळ बदलत चालल्याने या प्रथा कमी होत चालल्या आहेत. गाढवांचा बाजार या यात्रेत आजही पाहायला मिळतो. यात्रे दरम्यान ग्रामस्थ प्रथा-परंपरानुसार गादीवर न बसणे, मांसाहार न करणे आदी नियम पाळतात. पथ्य पाळतात. मात्र, यात्रेदरम्यान मुस्लिम व्यावसायिक यातल्या कुठल्याही प्रथा-परंपरेचे पालन करत नाहीत. अवैध व्यवसाय करतात. यातून तंटे निर्माण होतात. यातून ग्रामपंचायती मुस्लिम व्यावसायिकांना विरोध करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.