Tanpure on Krushi Sanshodhan Issues: बदलते हवामान, वाढलेली जागतिक संशोधनात्मक स्पर्धा, परिणामी कृषी संशोधनात आलेले शैथिल्य याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त पदांचा अनुशेष वाढत असून, तो भरून काढला पाहिजे. संशोधन दीर्घ कालीन चालणारी प्रक्रिया आहे.
कृषी क्षेत्रातील संशोधन दिवसेंदिवस आव्हानात्मक बनले आहे. संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित होण्यासाठी सहा-सात वर्षांचा कालावधी लागतो. पुढील सहा वर्षांत नवीन कृषी संशोधन अस्तित्त्वात येणार नाही, हा धोका लक्षात घेऊन, चारही कृषी विद्यापीठांतील संशोधक, संशोधक सहायक आणि इतर रिक्त पदांवर लवकर नियुक्त्या प्रक्रिया राबवावी, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे यासंदर्भात पत्र पाठवून माजी खासदार तनपुरे यांनी लक्ष वेधले आहे. भविष्यातील कृषी संशोधनाच्या विषयावर धोक्याची जाणीव करून दिली. राज्य सरकारने चारही कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक असल्याचे तनपुरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या संकल्पनेतून देशातील प्रत्येक प्रांतात कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी, कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढीसाठी, तसेच कृषी मालाचा दर्जा वाढविण्यासाठी एक कृषी विद्यापीठ निर्माण करण्यात आले. सुदैवाने महाराष्ट्र राज्याचा विस्तार व विविध भौगोलिक परिस्थितीमुळे चार कृषी विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली.
राहुरी (Rahuri) इथं 1968 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. सुमारे साडेसात हजार एकर सर्व प्रकारची जमीन अधिग्रहित करण्यात आली. ऊस, कपाशी, गहू, ज्वारी, हरभरा पिकांना भारी जमीन. पोयट्याची जमीन. फळबागांसाठी मुरमाड, तर मेंढी-शेळी पालनासाठी खडकाळ जमीन. त्यामध्ये मुळा धरणातून बारामाही 250 दशलक्ष घनफूट पाण्याची व्यवस्था, विजेची प्रचंड उपलब्धता, सर्वात महत्त्वाचे तालुक्यातील जनतेने संशोधनासाठी अत्यावश्यक असलेली राजकीय शांतता दिली.
या कृषी विद्यापीठांतील संशोधन कार्यामुळे राज्यातील शेती विकासाला निश्चितपणे गती मिळाली आहे. परंतु, अलीकडील काळात काही कारणांमुळे संशोधन, विस्तार व शिक्षण या त्रिसूत्री कार्यक्रमात शैथिल्य आले आहे, आणि हे नाकारता येणार नाही. मागील अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अनेक मंजूर पदे रिक्त आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 31 मे अखेर प्राध्यापक शास्त्रज्ञांची 57 टक्के पदे रिक्त आहेत. 31 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांची संख्या 66 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. एकाच व्यक्तीकडे तीन कामांचा पदभार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये अशीच परिस्थिती आहे. त्याचा थेट परिणाम कृषी संशोधनावर होत आहे. एक संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित होण्यासाठी सुमारे 6 ते 7 वर्षांचा कालावधी लागतो.
अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील सहा वर्षांत कोणतेच नवीन संशोधन अस्तित्वात येणार नाही. याचा प्राधान्याने विचार होऊन चारही कृषी विद्यापीठातील संशोधक, संशोधक सहायक व इतर तत्सम रिक्त पदांवर नियुक्त्या होण्याबाबत युद्ध पातळीवर हालचाली व्हाव्यात, असेही पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.