Ahilyanagar cooperative factory politics : डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राहुरी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 175 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
येत्या शुक्रवारी (ता. 16) उमेदवारी मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. परंतु, जिल्ह्यातील अग्रगण्य विखे आणि थोरात सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तशीच 'तनपुरे'ची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सूर सभासदांमधून उमटत आहे.
बंद पडलेल्या, थकीत कर्जामुळं जिल्हा बँकेची जप्ती असलेल्या, तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत एवढा इंटरेस्ट का? एक, दोन नव्हे, तर चार पॅनल निवडणूक (Election) रिंगणात असल्याची चिन्हं आहेत. तशा घोषणा देखील झाल्याने एवढा इंटरेस्ट का याबाबत सभासदांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
जनसेवा मंडळातर्फे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, महायुतीच्या विकास मंडळातर्फे आमदार शिवाजी कर्डिले, शेतकरी (Farmers) विकास मंडळातर्फे राजूभाऊ शेटे, कारखाना बचाव कृती समितीतर्फे अमृत धुमाळ यांनी आपापले पॅनल उभे करण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना, प्रत्येकाने बिनविरोध निवडणुकीसाठी तयार असल्याचेही सांगून टाकले. काही अपक्षांनी बिनविरोध निवडणुकीत आपली 'लॉटरी' लागेल, या आशेनं नशीब आजमावण्याचे ठरविले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत. परंतु पॅनल प्रमुख चर्चेला एकत्र न बसल्याने अजून चर्चेला तोंड फुटलेले नाही. त्यामुळे बिनविरोधची चर्चा फक्त, हवेतच दिसते आहे. तनपुरे कारखाना तालुक्याची अस्मिता असल्याने, त्या बॉयलर पेटावा, निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सभासदांची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सभासद शेतकऱ्यांनी ऊस दिल्याशिवाय कारखान्याला गतवैभव देखील मिळणार नाही, हे सर्वश्रुत आहे.
भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे साखर कारखान्यात राजकारण करणार नाही. बिनविरोधच्या चर्चेची तयारी आहे, असे सांगितले आहे. सभापती अरुण तनपुरे यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चेची तयारी दाखविली. अमृत धुमाळ व राजूभाऊ शेटे यांच्याशी बोलणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तनपुरे कारखाना तालुक्याची कामधेनू आहे. बंद पडलेला कारखाना चालू व्हावा, हेच ध्येय आहे. निवडणूक बिनविरोध होणार असेल तर प्रसंगी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी आहे. येत्या बुधवारी (ता.14) सकाळी दहा वाजता कारखान्याच्या क्लब हाऊस प्रांगणात सर्व पॅनल प्रमुखांनी एकत्र यावे. बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा करावी, असे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.