Sangamner political news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच पातळीवर तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडे युवा कार्यकर्ते ओढा जास्त आहे. यासाठी विचारांशी देखील तडजोड केली जात आहे. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अशा पक्ष बदलणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना फटकारलं आहे.
"जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो, हे आता सुरू झालं आहे. अशावेळी विचारांशी एकनिष्ठ राहणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घ्यायचं अन् वेळ आल्यावर धर्मांधांना पाठिंबा द्यायचा हे काय बरोबर नाही," अशा तिखट शब्दात बाळासाहेब थोरात यांनी पक्ष बदलणाऱ्यांना युवा कार्यकर्त्यांना फटकारलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी या दोघांनी पुरोगामी विचारांची ताकद मांडली. बाळासाहेब थोरातांनी धर्मांध शक्तीवर प्रहार केला. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "सध्या कोण कुठे पळून जाईल, हे सांगता येत नाही. महायुतीचे (Mahayuti) तीन, आमचे महाविकास आघाडीचे तीन, असे मार्ग उपलब्ध आहेत. सत्ता मिळते तिकडं म्हणजेच, जिकडं घुगऱ्या मिळेल तिकडं उदो उदो. परंतु अशावेळी विचारांशी एकनिष्ठ राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. इथं तर पुरोगामी विचार आहे. इथे सर्व पूर्वीचे कम्युनिस्टवाले होते. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि पाठिंबा द्यायची वेळ आल्यावर धर्मांधांना पाठिंबा द्यायचा, हे काय बरोबर नाही."
'पुरोगामी विचार हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. तो राज्यघटनेचा विचार आहे, यामुळेच आम्ही आजही शरद पवारसाहेबांबरोबर आहोत. या विचारांबरोबर राहण्याचे कारण म्हणजे, हा बहुजनांचा विचार आहे, गरिबांचा विचार आहे, शेतकऱ्यांचा विचार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव आता कोणीही घेतो, पण ते खऱ्यानं घेऊन, विचार अंमलात आणतात का, देखील तपासलं पाहिजे,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
'2007मध्ये शेतकऱ्यांची कृषी माफी केली. त्यावेळेस शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्री होते आणि मी राज्यात कृषिमंत्री होतो. पवारसाहेबांनी त्यावेळेस केंद्राला पटवून दिलं, हीच वेळ आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे त्यावेळेस ही कर्जमाफी झाली,' याची आठवण बाळासाहेब थोरात यांनी करून दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यासाठी कोणतीही वेगवेगळे फॉर्म भरून घेतले नाही, एकदाच बँकेत जाऊन कर्जमाफीचा फॉर्म भरून घेतला,असेही थोरात यांनी सांगितले.
'अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करताना, पाथर्डी अन् शेवगाव दौरा केला. पावसामुळे शेत जमिनी वाहून गेल्या, याचा अनुभव सांगताना शेतकरी ढसाढसा रडत होते. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. भाषण जोरदार केले गेले, पण शेतकऱ्यांनी नेमकं काय दिलं, हे तपासून तुम्ही देखील पाहिलं पाहिजे,' असा सल्ला थोरात यांनी दिला.
'विलास देशमुख यांच्या काळात देखील शेतकऱ्यांना मदत केली होती. 2004-05 मध्ये ही मदत केली होती. सततच्या पावसामुळे ज्वारी वाहून गेली होती, त्यावेळेस विलासरावांनी शेतकऱ्यांना मदत जात आहे, तर जाऊ दे, याचीही आठवण बाळासाहेब थोरातंनी करून दिली. शेतात कापूस सडलेला आहे, तो बाहेर काढायचं आहे, आलेल्या मदतीपासून तेवढं, तरी होईल का? असा प्रश्न थोरात यांनी केला. दुसरीकडे मात्र जोरदार खर्च सुरू आहे, यामुळे याच काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. सरकारने देखील ती केली पाहिजे,' असे थोरात यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.