Ahilyanagar News : नाशिकमधील अशोक खरात याच्या भोंदूगिरीमुळे राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघत असताना, राज्यातील अशा अनेक महाराजांच्या भोंदूगिरीच्या दुकानांचा भांडाफोड होताना दिसत आहे. हे पेव रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभरात अॅक्टिव्ह झाली आहे.
यातच संगमनेरमधील दत्तधाम सरकार नावाने साम्राज्य उभं केलेल्या, भक्तांचे आजार दूर करण्याचा दावा करत आर्थिक लूट करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्याविरोधात कारवाई करावी, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात उतरली आहे.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगावपान इथं दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला गडगे महाराज म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. तो आपला दरबार देखील भरवतो.
दत्तधाम सरकार नावाने या तथाकथित महाराजाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. मंत्रोच्चाराच्या जोरावर कॅन्सर, पॅरेलिसिस, अंधत्व, यासारखे आजार बरे करत असल्याचा दावा तो करतो. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य समन्वयक अॅड. रंजना गवांदे आक्रमक झाल्या आहेत. अंधश्रद्धा पसरववून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या भोंदूवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांकडे केली आहे.
दत्तधाम सरकार हा भोंदू असून अनेकांकडून 11 हजार, 21 हजार, 52 हजार, अशा रकमा घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं आहे. या भोंदूवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी देखील केल्याची माहिती अॅड. रंजना गवांदे यांनी दिली.
दत्तधाम सरकारमधील या सर्व भोंदूगिरीवर बोलताना अॅड. रंजना गवांदे म्हणाल्या, "विज्ञान खूप पुढं गेलं आहे. मानव चंद्रावर वस्ती बनवण्याच्या तयारीत आहे. असे असताना, अशा भोंदूने आपल्या दैवी शक्तीच्या जोरावर, कॅन्सर, अंधत्व दूर करण्याचा दावा करणं आणि लोकांची रिघ लागणं हे खूप हास्यास्पद अन् वेदनादायी आहे."
'महाराष्ट्रात खरात फाईल्स खूप गाजत आहे. त्या माणसानं महिलांचं शोषण केलं, पुरूषानं देखील लुबाडलं, राजकारण्यांना, अधिकाऱ्यांना देखील उल्लू बनवलं. हे सर्व समोर असताना, आज दत्तधाम सरकारमधील गडगेबाबा वेगवेगळे दावे करतो, आजार बरे करण्याचे दावे करतो, अपत्य देण्याचा दावे करतो, यातून लोकांचं फक्त मोठ्याप्रमाणात शोषण होत आहे,' असे खळबळजनक दावा, अॅड. रंजना गवांदे यांनी केला.
'अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की, त्याने खूप मोठ्याप्रमाणात पैशांची लूट केली आहे. आजार बरे झालेले नाहीत. उलट काही लोकांना त्याने दिलेल्या औषधामुळे त्रास झाला आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यानुसार लोकं तक्रारी करायला पुढं येत नाही. सरकारी यंत्रणेनं या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. या नियम तयार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे', असे अॅड. रंजना गवांदे यांनी सांगितले.
'महाराष्ट्रात अनेक भोंदू आहेत. पुण्याचा वैद्य असेल, चाकणजवळील बाबा असेल, असे अनेक बाबा समोर येत आहे. यांच्यावर कारवाई करणं पोलिस यंत्रणेचं काम आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक यांना निवेदन देऊन आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अजूनही कारवाई झालेली नाही. खरातसारखा बडा बाबा होऊ द्यायचा आहे का यंत्रणेला?' असा सवाल अॅड. रंजना गवांदे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.