Prahar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prahar News: दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी 'प्रहार' आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलनाचा दिला इशारा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News: आक्रमक आंदोलने आणि रोखठोक भूमिकेसाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू राज्याला परिचित आहे. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलनात आक्रमकपणा बरोबरच अभिनव आंदोलनाची झलक अनेकदा पाहावयास मिळते. आता नगर मध्येही प्रहारच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत अशाच एका अभिनव आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, आणि महानगरपालिकामधील दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसात वितरित करा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मुक्काम व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम लागू केला आहे.

दिव्यांगांना समाजात सहजतेने जगता यावे, यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत, तथापि ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विभाग आजही दिव्यांगांच्या बाबत उदासीन आहेत.

यामुळे दिव्यांगांच्या योजना व त्यासाठी असलेल्या राखीव निधी वाटपाबाबत दिरंगाई होऊन प्रशासनाकडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर पावले उचलून दिव्यांग अधिनियम 2016 नव्याने पारित केला. ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी दिव्यांगांचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवून दिव्यांगाना वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची माहिती विहित नमुन्यात अद्यावत भरून ठेवण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच पंचायत राज संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवून तो वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

तसेच सदरील निधी हा दिव्यांगाना रोख स्वरूपात देण्यात यावा, वस्तू स्वरूपात दिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून दिव्यांगांना गरज नसलेली वस्तू वारंवार वाटप होताना आढळून आलेले आहे.

त्यामुळे या निधीचा अपव्यय होत आहे. तरी नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांनी दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसांत वितरित करावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सर्व कार्यालयांचा ताबा घेवून दिव्यांगांसह मुक्काम व ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल, इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी दिला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT