Ashwi Khurd Gram Panchayat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner: मंत्री विखे गटाची सत्ता असलेल्या आश्वी गावात मोठी वृक्षतोड; ग्रामस्थांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Pradeep Pendhare

Ahmednagar News: मंत्री राधाकृष्ण विखे गटाची सत्ता असलेल्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे छाटण्याऐवजी तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 70 ते 80 झाडे ग्रामपंचायतीने तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्याची तक्रार मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.

आश्वी खुर्द येथील बाजारतळ ते दाढ रस्त्यावरील कोकजे वस्तीपर्यंत तसेच आश्वी-शिबलापूर रस्त्यावरील कॅनल ते भैरवनाथ मंदिर परिसरातील पथदिव्याखालील झाडांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याची स्थानिक शेतकऱ्यांची तोंडी तक्रार होती. या तक्रारीवरून ही झाडे छाटण्याची परवानगी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच दुसरीकडे वाढलेल्या झाडांमुळे बिबट्या रात्री रस्त्याने चालणाऱ्यावर हल्ला करू शकतो, असे कारण देत वनविभागाकडे ग्रामपंचायतीने झाडे छाटण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे एकाच परवानगीसाठी दोन वेगवेगळ्या विभागात दोन वेगवेगळी कारणे दिली गेली. मात्र, दोन्ही विभागांनी झाडे छाटण्याची मागणी केली होती तोडण्याची नाही.

आश्वी-दाढ रस्त्याच्याकडेला लावलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडे छाटण्याची परवानगी असताना ग्रामपंचायतीने नेमलेल्या ठेकेदाराने ती खोडापासून तोडली. ठेकेदाराने झाडे तोडायला सुरूवात केल्यावर ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. काही ग्रामस्थांनी झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराकडे धाव घेतली. परंतु उशीर झाला होता. ठेकेदाराने तोपर्यंत तब्बल लहान-मोठी सुमारे 70 ते 80 झाडे तोडली होती.

ही झाडे लाखो रुपये खर्च करुन दहा ते बारा वर्षे सरकारने जोपासली होती. परंतु आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने उतवळापणा करत ही झाडे छाटण्याऐवजी खोडापासून तोडली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आश्वी खुर्दच्या ग्रामस्थांनी यावर आता लढा उभारला आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

तसेच मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर देखील तक्रार दाखल करत आश्वी खुर्द ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, मोहित गायकवाड, संतोष भडकवाड, बापूसाहेब भवर यांच्यासह 30 ते 40 ग्रामस्थांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

दरम्यान, आश्वी खुर्दमधील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आश्वी खुर्द-दाढ रस्त्याच्या कडेला तोडण्यात आलेल्या 72 झाडांचा पंचनामा केला असून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यानंतर वरिष्ठांकडून प्राप्त आदेशानुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती वनविभागाच्या संगमनेर कार्यालयाचे वनपाल सुहास उपासनी यांनी दिली.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT