Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : 'मी शब्द फिरवत नाही, एकतर शब्द देत नाही आणि दिला तर...'; अजितदादांचा शेतकरी अन् महिलांना वादा

Ajit Pawar On Ladaki Bahin Yojana : "महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत त्या सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली."

Jagdish Patil

Nashik News, 02 August : 'एकतर मी शब्द देत नाही आणि दिला तर काहीही झालं तरी मागं हटत नाही, हा अजितदादाचा वादा आहे', अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत शेतकऱ्यांना आणि महिलांना विश्वास दिला आहे.

तसंच कोणतीही योजना बंद होणार नाही पण त्यासाठी आमच्या विचारांची माणसं निवडून द्या, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. अजित पवार यांच्या उपस्थितीत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात बोलताना अजितदादांनी (Ajit Pawar) तुफान फटकेबाजी करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. तिथल्या विकासासाठी 82 कोटी रुपयांचा निधी दिला. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आमची भावना आहे. मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्यामुळे 2 हजार 200 कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे."

दरम्यान, यावेळी त्यांनी या मतदारसंघातील आधीच्या आमदारांनी काय केले आहे? असा प्रश्न उपस्थित करत नितीन पवार आणि इतर आमदार माझ्याबरोबर असल्याने मी निधी देऊ शकलो, असंही सांगितलं. महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत त्या सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली.

मोलमजुरी करणाऱ्या माय माऊलींना मदत करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) दोन हप्त्यांचे पैसे रक्षाबंधनाच्या आसपास तुमच्या खात्यात येणार असल्याचं त्यांनी उपस्थित महिलांना सांगितलं. दरम्यान, सध्याच्या राज्य सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे चुनावी जुमला असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

ते म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत. गोरगरिबांच्या विकासासाठी 46 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. हा चुनावी जुमला असल्याचं विरोधक म्हणत आहेत. पण तसं अजिबात नाही. मी शब्द फिरवत नाही, एकतर शब्द देत नाही आणि दिला तर काहीही झालं तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आणि महिलांना विश्वास दिला.

तर वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात देणार, तरुणांना स्टायपेंड देणार असून 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार असल्याचंही अजितदादांनी यावेळी सांगितलं. तसंच विरोधकांच्या राज्य दिवाळखोरीत काढले या टीकेवर बोलताना ते म्हणाले, "राज्य दिवाळखोरीत अजिबात काढलेलं नाही. मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. निवडणूकमध्ये (Election) आमच्या विचारांची माणसे निवडून द्या, या योजना बंद होणार नाहीत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT