Mahayuti Internal Conflict : जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे मात्र महायुतीतच अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्ह्यातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे गिरीश महाजन या दोघांनीही या नेत्यांच्या पक्षप्रवेशावरुन उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीत नवा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षातील माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, महिला अध्यक्षा तिल्लोत्तमा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या नेत्यांसोबत जिल्हा बॅंकांचे संचालक, पंचायत समीती, बाजार समीतीमधील प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आले.
मात्र, या सगळ्यांच्या पक्षप्रवेशाला काही काळ लोटला नाही तोच महायुतीमधली अस्वस्थता समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडून शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करण्यात येत असल्याचा आक्षेप मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. ज्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लढतात त्याच मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी विरोधकांना आपल्या पक्षात घेतलं.
त्यांना पक्षात घेण्याआधी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती हे सागंतानाच गुलाबरावांनी अजित पवारांना युती धर्माचीही आठवण करुन दिली आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे, मग आम्हालाही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल असा इशाराही गुलाबरांवांनी दिला आहे.
खास करुन कट्टर राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांनी पक्षात घेतल्याने गुलाबराव पाटील नाराज आहेत. ज्या लोकांनी अजित पवार यांच्यावर आजवर टीका केली. त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांनाच अजित पवार यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. पण अजित पवार यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होईल असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. आमची इच्छा नसताना अजित पवार यांनी त्यांना पक्षात घेतल्याचं गुलाबराव पाटील यांचे म्हणणे आहे.
मात्र दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही या पक्षप्रवेशावरुन नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या नेत्यांविरोधात जे लढले अशा लोकांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा प्रोटोकॉल ठरला होता. मात्र अजित पवारांनी तरीही काही लोकांना पक्षात घेतलं, याबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. अजित पवारांनी उचलेल्या या पावलाने आम्हालाही मार्ग मोकळा झाल्याचे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
अजित पवार यांनी महायुतीचा प्रोटोकॉल मोडला असल्याचा आक्षेपच गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी घेतला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीमध्ये दुरावा निर्माण होतो की काय अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे. त्यामुळे महायुतीमधील हा वाद आणखी वाढणार की यावर वरिष्ठ पातळीवर काही तोडगा काढला जाणार हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.