Ajit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: अजित पवारांनी धसका घेतलेले संदीप शेळके कोण?

Sampat Devgire

Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची जनसमान यात्रा आज सिन्नरला होती. मात्र या यात्रेत शरद पवार पक्षाच्या समर्थकांनी काही प्रश्न विचारले होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना चक्क पोलिसांनी कोठडीत डांबले.

यासंदर्भात नांदूर शिंगोटे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी संदीप शेळके यांनी काही प्रश्न उपस्थित केले. लाडकी बहीण योजनेची संबंधित हे प्रश्न होते. या प्रश्नाचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापुढे उभा होऊ नये, यासाठी सबंध पोलिस यंत्रणा पहाटेपासून कामाला लागली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. पवार यांची जन्म सन्मान यात्रा पूर्ण होईपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार रवाना झाल्यानंतरच सायंकाळी त्यांना सोडण्यात आले.

शेळके यांना पोलीस (Police) ठाण्यात नेल्याचे कळतच पक्षाचे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले. ग्रामस्थ शेळके यांना पाठिंबा म्हणून पोलीस ठाण्यात बसून राहिले. त्यामुळे पोलिसांची ही चांगलीच धावपळ झाली.

शेळके यांनी उपमुख्यमंत्र्यांना माझी लाडकी बहीण या योजने ऐवजी सिन्नर तालुक्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहे. त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी काय उपाययोजना केली? असा प्रश्न केला होता.

महावितरण कंपनीने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना व त्यांच्या रखडलेल्या वीज बिलांसाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकतात. या योजना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार काय करणार आहेत? अशी विचारणा देखील केली होती.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शेतमाल पिकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे. त्यांच्याबाबत उपमुख्यमंत्री म्हणून आपण काय केले?

महापालिकेची पाणीपट्टी आणि त्यावरील दंड व व्याज शासनाने माफ केली. नगरपालिकेकडून पाणीपट्टीमध्ये थकीत असलेल्या रकमेवर २४ टक्के दंड व व्याज आकारला आहे. महापालिका आणि नगरपालिका यांच्याबाबत सरकारने हा भेदभाव का केला? याचा खुलासा उपमुख्यमंत्री करतील का? असा प्रश्न शेळके यांनी केला होता..

दुधाला भाव नाही. खतांवर जीएसटी आकारला जातो. प्रचंड महागाई वाढली आहे. कांदा निर्यात बंदी अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढलेल्या दराच्या बियाण्याबाबत सरकारकडून काय उपाययोजना केली आहे. या समस्यांविषयी आणि प्रश्नांचा खुलासा सिन्नरच्या जनतेला अपेक्षित आहे. तो कराल का? असा प्रश्न शेळके यांनी केला होता.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेळके यांनी हे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांचा पोलीस प्रशासनाने चांगलाच धसका घेतला. शेळके यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी नजर कैदेत ठेवले. या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दौऱ्यात या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी प्रामुख्याने लाडकी बहीण योजना आणि स्थानिक आमदारांचे कौतुक करीत आपल्या दौरा पूर्ण केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री आणि नेते पुढे रवाना झाले. मात्र सिन्नरच्या प्रश्नांना उत्तरे न देता कार्यकर्त्यांना पोलिसांनी डांबून ठेवल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT