Sharad Pawar, Ajit Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ncp Politics News : नाशिकचा कोणता आमदार अजित पवारांची साथ सोडणार?

Sampat Devgire

Sharad Pawar Vs Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे दोन मिळावे सोमवारी पार पडले. यानिमित्ताने अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना परतीचे वेध लागण्याचे लपून राहिले नाही. नाशिक जिल्ह्यातील कोणता आमदार यामध्ये पुढे येतो याची उत्सुकता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत, अशी बातमी राज्यभर चर्चेचा विषय आहे. त्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची किनार आहे. या निकालाने अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेलेल्या आमदारांना पुढे काय? या प्रश्नाने ग्रासल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदार संघातील मतदारांनी नाकारले आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या आघाडीसह विजय मिळाला आहे. यामध्ये प्रचारात असलेल्या गद्दार विरुद्ध खुद्दार याचा मतदारांवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो.

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहे, अशा स्थितीत मतदारसंघात नव्याने बांधणी करणे आणि मतदारांचा कल बदलणे कठीण आहे. जिल्ह्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नितीन पवार आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ असे सहा आमदार आहेत.

अजित पवार गटात गेलेल्या सर्व सहा आमदारांच्या विरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार हे निश्चित आहे. या उमेदवारांच्या बाजूने मतदार संघातील नागरिकांमध्ये सहानुभूती आहे.

प्रस्थापित अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडल्याने त्या आमदारांविषयी मतदार आणि पदाधिकारी सगळ्यांमध्ये रोष आहे. या आमदारांना पुन्हा पक्षात घेऊ नये, असा ठराव देखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आतापासून विधानसभेचे कोणते आमदार कोणत्या गटात जाणार या चर्चेने ढवळून निघाले आहे.

या संदर्भात आमदार कोकाटे यांनी नुकतेच एक विधान केले आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांना सोडणे किंवा तसा विचार करण्याचा विचारही कोणत्याही आमदाराच्या मनात येऊ शकत नाही, असे विधान केले आहे. हे विधान आमदार कोकाटे यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी केले की, मनातील भीती लपविण्यासाठी केले याची जोरदार चर्चा आहे.

खुद्द कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात त्यांचे बहुतांशी समर्थ वाजे गटात सहभागी झाले आहेत, अशा स्थितीत अजित पवार गटात असलेल्या आमदारांना किती कार्यकर्ते मनापासून साथ देतील? या भीतीने अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना ग्रासले आहे.

SCROLL FOR NEXT