Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अजितदादा बोलले पुण्यात...नेत्यांची झोप उडाली महाराष्ट्रात!

Sampat Devgire

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी पुणे येथे जिल्हा परिषद (ZP election) निवडणुकांसाठी तयार रहा, असे सांगितले. त्यांनी हे विधान पुणे शहरात केले, मात्र त्यामुळे राज्यभरातील विद्यमान सदस्य व इच्छुकांची झोप उडाली. शासनाच्या स्तरावर (Maahavikas Aghadi Government) निवडणुकीबाबत सुरु असलेल्या निर्णयप्रक्रीयेने निवडणुका किमान चार ते सहा महिने पुढे जाणार आहेत. त्यामुळे अजितदादांचे ऐकावे की शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी अशी द्वीधा मनस्थिती झाली आहे.

महापालिकांची प्रभागरचना, जिल्हा परिषदव पंचायत समित्यांच्या गट-गण रचनेची प्रक्रीया अंतिम टप्प्यात होती. त्यात राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व महपालिकांच्या प्रभागांची रचना करताना लोकसंख्या निकष बदलल्याने प्रभागांच्या संख्येत वाढ झाली होती. सर्वच विद्यमान सदस्य आणि नगरसेवक त्यादृष्टीने तयारीला लागले होते. त्यासाठी भेटीगाठी, केलेल्या कामांचा प्रचार, कार्यकर्ते सांभाळणे, नेत्यांचा संपर्क यात सर्वच व्यस्त होते मात्र ऐनवेळी राज्य शासनाने प्रभागरचनेचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या धोरणात्मक राजकीय निर्णयासाठी शासनाने निर्णय घेतला. त्याने निवडणुका किमान चार ते सहा महिने पुढे जाणार आहेत. त्यामुळे बहुतांश सदस्य निश्चिंत झाले होते.

रविवारी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांसाठी तयार रहा असे विधान केले. त्यामुळे अनेक इच्छुकांची झोप उडाली आहे. काहींचा गोंधळ झाला. येत्या २० मार्चला जिल्हा परिषदांचा कार्यभार प्रशासकांकडे वर्ग होत आहे. महापालिकांत यापूर्वीच प्रशासक नियुक्तीची प्रक्रीया झाली आहे. या स्थितीत सदस्यांनी सुचविलेली जिल्हा परिषदांत सेस, १५ वा वित्त आयोगाची कामांच्या यादीला मान्यता मिळालेली नाही. येत्या चार दिवसांत प्रशासकीय आदेश व या कामांना मंजुरी मिळणे अपेक्षीत आहे. अन्यथा ते निर्णय प्रशासक घेतील. या सर्व स्थितीत अजितदादांनी विधान पुण्यात केले मात्र सबंध महाराष्ट्रात राजकीय नेत्यांचा गोंधळ उडाला.

आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुक लढविणार की स्वतंत्र याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काठावरच्या, निवडून येण्याचा आत्मविश्वास नसलेल्यांना आघाडी व्हावी असे वाटते. प्रस्थापित नेत्यांचे मत मात्र वेगळे आहे. सध्या ३५ ते ४० हजार लोकसंख्येचा गट आहे. नव्या रचनेत तो सुमारे २८ हजारांचा अपेक्षित आहे. नव्या रचनेत नाशिक जिल्ह्यात बारा गट वाढणार आहेत. त्यात नगरपालिका झाल्याने ओझर (निफाड) हा गट कमी होईल. येवला, इगतपुरी व देवळा हे तीन तालुके वगळता उर्वरीत सर्व तालुक्यांत एक गट वाढेल. त्यात ज्या गटांत सदस्यांनी मोठी कामे केली, ते गट अस्तित्वात नसणार. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बिघडणार. या सर्व गोंधळात अनेकांची झोप उडाली. खीशाला झळ बसली ती वेगळीच.

अद्याप शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गण रचनेबाबत नेमकेपणाने आदेश प्राप्त झालेले नाही. प्रशासक नियुक्तीची प्रक्रीया सुरु आहे. त्यामुळे सर्वच सदस्यांची विकास कामे व जनतेशी संपर्क सुरु आहे. तो सबंध पाच वर्षे असतोच.

- अमृता पवार, सदस्य, देवगाव जि. प. गट.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT