Angry Farmersin Chadwad  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘विकसित भारत' रथ गावातून हाकलला!

Sampat Devgire

Maharashtra Farmers Politics : कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यावर तोडगा निघत नाही आणि शेतकऱ्यांची नाराजीही दूर होत नाही, अशी स्थिती आहे. चांदवड येथे केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रचारासाठी आलेल्या अधिकाऱ्यांपुढे चक्क शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात भाषणे करीत प्रचाराची व्हॅन गावातून अक्षरशः हाकलली. (Farmers questioned Officers whether you want to devolop India by keeping Farmers Poor)

उर्धुळ (Nashik) येथे ‘विकसित भारत' योजनेच्या प्रचारासाठीचा रथ शेतकऱ्यांनी (Farmers) संताप व्यक्त करीत गावातून परत पाठवून दिला. भाजपच्या (BJP) या योजनांच्या रथाला विविध गावांत विरोध होत असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

उर्धुळ (चांदवड) ग्रामपंचायत कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार करणारा रथ आला होता. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. केंद्र सरकारच्या प्रचाराऐवजी शेतकऱ्यांनीच कांद्याची टंचाई नसताना केंद्र सरकारने निर्यातबंदी का केली? पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? असे प्रश्‍न उपस्थित करीत उर्धुळ (ता. चांदवड) येथील ग्रामस्थांनी केंद्र सरकारविषयी रोष व्यक्त केला. केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. कांदा मातीमोल किमतीत विकला जात आहे. त्यातच, निर्यातबंदी केली असा आरोप यावेळी केला.

यावेळी ग्रामस्थांची गर्दी जमली. ग्रामस्थांनी तीव्र शब्दांमध्ये सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविषयी आक्षेप घेतला. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आम्हांला लोककल्याणकारी योजनाबाबत माहिती देऊ नका, आमच्या गावात सरकारच्या कोणत्याही योजनांचा प्रचार करू नका, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

कांद्याला अपेक्षित भाव मिळत असताना, केंद्र सरकारने निर्यातबंदी केली व त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला. दूध दरवाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. मात्र, त्याबाबत सरकार गप्प आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केली. वास्तवात शेतकऱ्याला भिकेला लागण्याची वेळ आली आहे. आम्ही शेतात पिकविलेल्या मालाला मातीमोल भाव सरकारी धोरणामुळे मिळत असल्याचे ग्रामस्थांनी वाहनचालक आणि रथासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विरोध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT