<div class="paragraphs"><p>NCP leader Eknath Khadse &amp; Shivsena leader Gulabrao Patil</p></div>

NCP leader Eknath Khadse & Shivsena leader Gulabrao Patil

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

जिल्हा बँकेचा गुलाल उतरण्याआधीच शिवसेना, राष्ट्रवादीत जुंपली!

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

बोदवड : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. दोघांनी एकमेकांची उणीदुणी काढली. निमित्त ठरले अवैध धंदे सुरू असल्याची निवेदने. त्याचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची किनार आहे. त्यामुळे हा वाद महाविकास आघाडीत बिघाडीला (Mahavikas Aghadi) निमित्त ठरेल काय याची चर्चा सुरु झाली आहे.

जिल्हा बँकेत (DCC Bank) महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेल्या शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी, (NCP) काँग्रेसचा विजयाचा गुलाल अजून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून उतरलेला नाही. तेवढ्यात शहरात पत्ते, जुगार सर्रास सुरू असल्याचे आरोप दोन्ही बाजूंकडून झाले.महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे मजबूत पक्ष आहेत. काँग्रेस सोबत असली काय नसली काय, त्यावर फारशी गणिते अवलंबून नाहीत. शिवसेनेकडे गुलाबराव पाटील यांच्यारूपानं मंत्रिपद आहे, तर राष्ट्रवादीकडे एकनाथ खडसे यांच्यासारखा मुरब्बी, लोकमान्य नेता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ राहणार हे स्वाभाविक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र नेत्यांच्याच मनात महाविकास आघाडी होऊ नये, असं बहुधा शिजत असावं. राष्ट्रवादीचे नेतेपद नाथाभाऊंकडे आहे. प्रचाराची धुरा त्यांच्याकडे असेल.

शिवसेनेने रवींद्रभय्यांना बोदवडमध्ये चुकीची वागणूक दिली, त्यातून वाद घडले. जिल्हाध्यक्षांना लक्ष्य केल्याने राष्ट्रवादीची चिडचिड स्वाभाविक आहे. खरंतर ज्या रवींद्रभय्यांनी माघार घेत शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना विधानसभेत निवडून आणले, त्यांच्याबद्दलची शिवसेनेची एवढी अनास्था योग्य नाही. रोहिणी खडसेंचा पराभव या खेळीमुळे झाला. त्यामुळेच आता बोदवडमधील वादावादीचे पडसाद जिल्हाभर उमटत आहेत. वरकरणी भाजपला थोपविण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न असला तरीदेखील वस्तुस्थिती काही वेगळं सांगतेय. शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा एकत्र येत वाद सोडविण्यावर भर राहील की भिजत घोंगड ठेवण्यावर, हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल. कारण महाविकास आघाडीच्या फुग्यातील हवा बोदवडच्या घटनेने काढून घेतली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम या घटनेनंतर अधिक वेगाने वाजू लागतील. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या गप्पा एकीकडे सुरू असताना या घटनेमुळे आघाडी एकत्रित निवडणुकांना सामोरे जाऊ शकेल, अशी शक्यता धूसर दिसते. निवडणूक पूर्वआघाडीपेक्षा निवडणूकपश्चात सत्तेसाठी एकत्र येण्याचा फॉर्म्युला जळगाव जिल्हा परिषदेसाठीही ठरेल, अशीच चिन्ह सध्यातरी दिसत आहेत.

चोपड्यातील घडामोडीचे संकेत...

चोपड्याच्या आदिवासी भागातील शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणजे रायसिंग फुगा भादले. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता त्यांची दोघे मुले ज्ञानेश्वर आणि रवींद्र भादले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीकडे आदिवासी मतदारसंघात चांगला उमेदवार नाही. रायसिंग भादले यांची संपूर्ण कारकीर्द काँग्रेसमध्ये गेली. आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भादले बंधू राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या सध्याच्या आमदार लता सोनवणे यांच्याबद्दलची नाराजी राष्ट्रवादीला चोपड्यात पोषक ठरू शकते. भादले यांच्या प्रवेशामागे विधानसभेची गणितं आहेत. नेत्यांकडून काहीतरी आश्वासनं मिळाल्याशिवाय असे प्रवेश होत नसतात. त्यामुळे काळाच्या उदरात काय दडलंय, हे स्पष्ट होण्यासाठी पुढच्या घडामोडींची वाट पाहावी लागेल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT