Prithviraj Chavan- Nana Patole-Ashok Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Chavan : 'मी मुख्यमंत्री, त्यावेळी काँग्रेसच्या 82 जागा होत्या, पृथ्वीराजबाबांनी त्या 42 केल्या अन्‌ नानांनी 16 वर आणल्या'

Assembly Election Result 2024 : मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. मीही चौदा वर्षे वनवास भोगला, त्यामुळे मी त्या भावना व्यक्त केल्या. माझा कोणावरही आकस नाही. कदाचित रागाच्या भरात बोललो असेल.

Vijaykumar Dudhale

Shirdi, 29 November : काँग्रेसच्या पराभवावर मी बोलणं उचित ठरणार नाही. काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करावं. मी राज्याचा प्रमुख असताना काँग्रेसच्या 82 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराजबाबा आले, त्यांनी 82 च्या 42 केल्या आणि नानांनी 42 वरून 16 वर आणलं आहे, असा हा इतिहासच असून आकडेवारी समोर आहे, अशा शब्दांत खासदार अशोक चव्हाण यांनी पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोलांना खोचक टोला लगावला.

काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे, त्याला राज्याचे आणि केंद्राचे नेतृत्व जबाबदार आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या पराभवावर अधिक मला काही सांगायची गरज नाही. सध्याची काँग्रेस पक्षाची जी परिस्थिती आहे, त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे. नेमकं काय होतंय, हे त्यांना कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. मी काय सल्ला द्यायला बसलो नाही. मला त्यांना सल्लाही द्यायचा नाही. बरीचशी मोठी, जाणकार आणि लोकप्रिय माणसं आहेत, त्यामुळे त्यांचा तो निर्णय घेतील.

मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. मीही चौदा वर्षे वनवास भोगला, त्यामुळे मी त्या भावना व्यक्त केल्या. माझा कोणावरही आकस नाही. कदाचित रागाच्या भरात बोललो असेल, पण त्याचं त्यांनी फारसं मनावर न घेता राजकारणात हार जीत होत राहते, त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, असा सल्लाही अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) दिला.

ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करणे योग्य नाही. काँग्रेसचा तेलंगणा, कर्नाटकात मुख्यमंत्री आहे, त्या वेळी कोणी काय बोलले का? उलट सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी आवाहन केले होते की, ईव्हीएमच्या संदर्भात कोणाकडे पुरावा असल्यास पुढे यावे आणि भूमिका मांडावी. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर त्यावर भाष्य करणे, म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आमच्या बहुमताला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील

चव्हाण म्हणाले, एकनाथ शिंदे नाराज असण्याचे काही कारण नाही. दोन अडीच वर्षे मुख्यमंत्री भोगल्यानंतर पायउतार होताना वाईट वाटणे स्वभाविक आहे. पण त्यांनी मोठ्या मनाने महायुतीचा निर्णय स्वीकारण्याची तयारी केली आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय ते स्वतः घेतील, त्यावर आपण काही बोलणं योग्य होणार नाही.

संजय राऊतांनी महाआघाडीची चिंता करावी

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाची चिंता करावी. आमच्या युतीमध्ये कोणाला काय मिळणार आहे, याची चिंता राऊत यांनी करू नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला. राज्यसभा आणि विधान परिषदेची एक जागा निवडून आणण्यासाठीही महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यांच्यात अगोदर कोणाला संधी द्यायची, याचा विचार त्यांना करावा लागेल.

नांदेडमध्ये पराभव का झाला?

पोस्टल मतदानात भाजपचा उमेदवार मागे पडला, त्यामुळे लोकसभच्या नांदेड पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विरोधात कोणीतरी हवा ना, असा उलटा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.

मुख्यमंत्रिपदासाठी भाजप जो निर्णय घेईल, त्याला माझा पाठिंबा

महायुतीचा मुख्यमंत्री ठरण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्या प्रक्रियेत मी नसल्याने मी जास्त काही सांगू शकणार नाही. तीनही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये विचारविनिमय झालेला आहे. रात्री उशिरा दीडपर्यंत बैठक चालली आहे. बहुतांश विषय मार्गी लागलेली आहे. येत्या एक-दोन दिवसांत उर्वरीत विषयही मार्गी लागेल. मुख्यमंत्रिपदाबाबत भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्यासोबत मी असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT