Jayashree Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayashree Thorat : 'खबरदार, माझ्या बापाबद्दल बोललात'; जयश्री थोरात म्हणाल्या, 'आता शिर्डी पण जिंकणार'

Sangamner Assembly Constituency : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत थोरात आणि विखेंची पुढची पिढी राजकीय संघर्ष करताना दिसत आहे. जयश्री थोरातांना सुजय विखेंवर जोरदार प्रहार केला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीचा वातावरण जसं तापू लागलं आहे, तसं राजकीय संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील थोरात-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकावर पोचला आहे. हा राजकीय संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत पोचलाय. जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात वाक् युद्ध रंगलं आहे.

दोघंही एकमेकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. सुजय विखे यांच्या टीकेवर जयश्री थोरात चांगल्याच कडाडल्या आहेत. 'खबरदार, माझ्या बापाबद्दल बोललात, तर याद राखा. वाकड्या नजरेनं पाहिल्या, जशास तसं उत्तर दिलं जाईल. शिर्डीत लक्ष घालून तिथं पण जिंकणार', असा इशारा जयश्री थोरातांनी दिला आहे.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात राज्याच्या राजकारणात गुंतले असल्याने त्यांच्या संगमनेर बालेकिल्ला त्यांची कन्या जयश्री थोरात संभाळत आहेत. प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय. सभा, चौकसभा, मेळावा यावर त्यांचा भर दिसतो. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातून सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्या वाक् युद्ध रंगलं आहे.

खोके सरकारवर टीकास्त्र

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांनी घरातच पद वाटल्याचा घणाघात केला होता. त्याला जयश्री थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, "त्यांचा आरोप बरोबर आहे. थोरातसाहेबांनी जे केले ते बरोबरच केले. थोरातसाहेबांचा परिवार कमी नाही, तो सात लाख लोकांचा परिवार आहे. संगमनेर तालुका थोरातसाहेबांचा परिवार आहे. या तालुक्याकडे वाकड्या डोळ्यानं बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय संगमनेर तालुका राहणार नाही". अडीच वर्षापूर्वी तोडून, फोडून जे काही खोके सरकार बनलं आहे, तेव्हापासून जो काही त्रास सुरू केलाय. थोरातसाहेब सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले असून, कोणाला टाचेखाली चिरडलं नाही, हे लक्षात ठेवा, असे जयश्री थोरात यांनी म्हटलं.

विखेंबरोबर फिरणाऱ्यांना सल्ला

"थोरातसाहेब संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे. खबरदार, माझ्या बापाविषयी बोलले तुम्ही, हा बाप माझ्या एकटी नाही, इथं संगमनेरमध्ये असलेल्या सात लाख लोकांचा बाप आहे, सात लाख! ज्यांना स्वतः घर संभाळता येत नाही, ते काय दुसऱ्याचं संभाळणार. स्वतः संस्था कर्जात बुडलेल्या आहेत. बाभळेश्र्वर दूध संघ बंद पाडला, गणेश कारखाना आठ वर्ष बंद ठेवला, राहुरी कारखान्याचं काय केलं? हे टवाळके इथं फिरताय, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही कोणाला घरात घेत आहात. आपल्या संस्थांचे काय करतील, त्याचा विचार करा", असा सल्ला जयश्री थोरातानी विखेंबरोबर फिरणाऱ्यांना दिला.

'शिर्डी'बाबत विखेंना सूचक इशारा

'अभ्यास कच्चा असलेल्या हा समृद्ध संगमनेर तालुका कसा झेपणार? त्यांचा तालुका बघा, गेल्या 50 वर्षांपासून त्यांच्या हातात आहे. त्यांच्या तालुक्याची काय हालत करून ठेवली आहे, ते बघा. आता आपल्याला विचार करावा लागेल, शिर्डी विधानसभा मतदार संघात आपलाच आमदार हवा आहे. साहेबांना मानेल, असाच आमदार आपल्याला तिथं हवा आहे', असे सांगून तिथं शिर्डी विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचा सूचक इशारा जयश्री थोरातांनी दिला.

फसलेल्या वाळू धोरणावर टीका

'साहेबांसह आपले 28 गावं तिथं मतदार आहेत. 2009 मध्ये पडता पडता वाचते होते, आपल्या 28 गावांमुळे. पण यावेळी 28 गावांनी निर्धार केला आहे. तुम्ही जर चांगलं काम केले असते, तर ही 28 गावे तुमच्याबरोबर राहिले असते. पण तुम्ही फक्त आमच्या लोकांना त्रास देण्याचं काम केले. खोट्या केसेस केल्या. मोदी शस्त्र 'ईडी', तर यांचे शस्त्र खोट्या केसेस, अॅट्रोसिटी, जो यांच्याविरोधात बोलेल त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं', असा आरोप करत फसलेल्या वाळू धोरणावर जयश्री थोरात यांनी जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT