Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: भुजबळ पोलिसांवर संतापले, मारेकरी पोलिसांनी नव्हे तर लोकांनी पकडलेत!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल हत्या झाली. या हत्येमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

बाबा सिद्दिकी यांच्यावर काल तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये हरियाणा येथील बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. मात्र एकंदरच या प्रकरणावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी नेमके वर्मावरच बोट ठेवले आहे. दोन हल्लेखोरांना पकडले, अशा बातम्या येत आहेत. त्यात पोलिस फुशारक्या मारत आहेत. मात्र या हल्लेखोरांना पोलिसांनी नव्हे तर लोकांनी पकडले आहे. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

श्री भुजबळ म्हणाले, आपण मुंबई पोलिसांची तुलना जागतिक दर्जाच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांची करतो. पण आता वाईट वाटायला लागलं आहे. जे सुरू आहे, ते बरोबर नाही. आमच्या पक्षाच्या दोन नेत्यांची हत्या झाली आहे.

ते म्हणाले, सिद्दिकी यांना पंधरा दिवसांपूर्वी वाय दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली होती. त्यांना धमक्याही आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हे संरक्षण दिलं होतं. परंतु संरक्षण दिलं म्हणजे पोलिसांचं काम संपलं का? असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांचं कर्तव्य संपलं, असं दिसायला लागला आहे.

धमकी आली तर ती कुठून आली? त्या धमकीचा काय बंदोबस्त करायचा हे पोलिसांचं काम आहे. मात्र तसे झालेले दिसत नाही. गेल्या आठ दिवसात आमच्या पक्षाच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. नुकतीच हत्या झालेल्या कुर्मी यांच्यावर तर त्यांच्या घराजवळ हल्ला झाला होता.

एकंदरच हल्ली दहा-पंधरा हजार रुपये देऊन हत्या केल्या जातात. हे तर कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. या मागचा करता करविता कोण? हे शोधणे महाराष्ट्र पोलिसांना आव्हान आहे. त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले पाहिजे.

यावेळी भुजबळ यांनी एकंदरच पोलीस आणि पोलिसांची कार्यपद्धती याबाबत खंत व्यक्त केली. पोलीस अधिकारी कमकुवत आहेत. ते काम करू शकत नाही, अशातला भाग नाही. मग का काम करत नाहीत, हे समजून घेतले पाहिजे. सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे दोघेजण पकडले. खरे तर त्यांना जमावाने पकडून दिले आहे.

बातम्या येतात दोन जण पकडले. जणू काही पोलिसांनीच पकडले असे भासवले जात आहे. खरोखरच संताप वाटायला लागला आहे. ही अशी परिस्थिती असेल तर, ती अत्यंत भयानक आहे.

गृहमंत्री असताना अशी स्थिती का निर्माण झाली? पूर्वी मोठ्या प्रमाणात गॅंगवर सुरू होतं. बॉलीवूड मधील काही लोक मुंबई सोडून हैदराबादला चालले होते. त्यावेळेस आम्ही कार्यक्षम पोलीस अधिकारी नियुक्त केले. सगळ्यांनी मिळून ती परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांना पूर्णपणे फ्री हँड द्यावा लागेल. अन्यथा वाय सिक्युरिटी द्या अथवा झेड सिक्युरिटी द्या. परराज्यातून ही पोरं येतील आणि दहा-पंधरा हजार रुपयात पिस्तूल घेऊन सांगतील त्याला मारायचं काम करतील. हे अतिशय घातक आहे. ही गुंडगिरी तातडीने नष्ट केली पाहिजे. त्यामागे कोण आहे, हे शोधून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, असे श्री भुजबळ म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT