Bachchu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, 'एमआयएम'ची धार्मिकता पचविण्यापलीकडे, तिसऱ्या आघाडीत स्थान नाही!

Sampat Devgire

Bachchu Kadu News: लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही `एमआयएम` पुन्हा एकदा एकटे पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या संभाव्य तिसऱ्या आघाडीत या पक्षाला स्थान मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याआधी याबाबतचा निर्णय घोषित होईल, असा दावा त्यांनी केला.

तिसऱ्या आघाडीत कोण असेल याचे स्पष्ट संकेत देखील कडू यांनी दिले. या संदर्भात उद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी बैठक होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि अन्य काही नेत्यांसमवेत ही बैठक असेल, असे कडू म्हणाले.

निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी यांची जोरदार व्युह रचना सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी कोणाला धक्का देते याची देखील उत्सुकता आहे.

आमदार कडू यांनी आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी सर्वात शक्तिशाली असेल, असा दावा केला. महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा आणि खऱ्या प्रश्नांना आमचे आघाडी निवडणुकीत स्थान देईल. जनतेचे प्रश्नांवर सध्याच्या सरकारने गांभीर्याने काहीही कृती केली नसल्याने जनतेला नवा पर्याय हवा आहे.

हा पर्याय देण्याची तयारी तिसरी आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. ही आघाडी करताना यामध्ये `एमआयएम` या पक्षाला स्थान नसेल. `एमआयएम` हा पक्ष प्रामुख्याने धार्मिक ध्रुवीकरण आणि राजकारणावर फोकस करतो.

`एमआयएम` पक्षाची धार्मिकता आम्हाला पचवता येण्यासारखी नाही. त्यामुळे विचारपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमची लढाई जात आणि धर्मापलीकडे असेल. धार्मिकता किंवा धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून संभाव्य तिसरी आघाडी अंतर ठेवून असेल.

आमदार कडू यांनी आमचे विचार आणि धोरण अतिशय स्पष्ट आहे, असे सांगितले. महाराष्ट्रातील जनतेच्या खऱ्या समस्या आणि राजकीय प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उद्या सर्व नेते एकत्र येत आहेत. त्यात महत्त्वाचा निर्णय होईल, असेही आमदार कडू यांनी सांगितले.

तिसऱ्या आघाडीबाबत आमदार कडू यांनी केलेल्या विधानामुळे विधानसभा निवडणुकीतील राजकीय दिशा स्पष्ट होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील `एमआयएम` एकटी पडणार आहे. त्यामुळे `एमआयएम`चा अल्पसंख्यांक मतांचा प्रभाव असलेल्या किती मतदारसंघात महाविकास आघाडीला फटका बसतो, याची आता उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT