Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना फुटल्याची बाळा नांदगावकरांना वेदना : जागविल्या शिवसेना बांधणीच्या आठवणी

सरकारनामा ब्युरो

नाशिक - राज्यातील शिवसेनेत बंडाळी झाली. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे गट व भाजपची सत्ता राज्यात आली आहे. मात्र एक काळ शिवसेनेचे मंत्री राहिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी शिवसेनेत असताना पक्ष विस्तार कसा केला होता, त्या आठवणी त्यांनी जागवत शिवसेना फुटल्या बद्दल वेदना होत असल्याचे सांगितले. नाशिक येथील मनसेच्या राजगड कार्यालयाच्या वर्धापन दिन प्रसंगी ते बोलत होते. (MNS News Updates)

बाळा नांदगावकर म्हणाले, आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख कोणाला करायचे हा विचार सुरू झाला. रघुनाथ मोरे हे दिघेच्या सतत बरोबर असणारे उत्तम व्यक्तिमत्त्व होते. म्हणून मी रघुनाथ मोरे यांचे नाव सूचविले. रघुनाथ मोरे जिल्हा प्रमुख झाले. दुर्दैवाने एक महिन्यानंतर रघुनाथ मोरे यांचा अपघात झाला. त्यामुळे जिल्हा प्रमुख करण्यासाठी माझ्यासमोर लोक होते राजन विचारे, रवींद्र पाटेकर, नरेश म्हस्के. यातील एक आमदार, एक खासदार व एक महापौर आहेत. आणि एकनाथ शिंदे शहर प्रमुख पदासाठी माझ्या डोळ्यासमोर होते, अशा आठवणी त्यांनी जागविल्या.(Shivsena latest news)

ते पुढे म्हणाले की, रघुनाथ मोरे वाशीच्या एम.जे. एम. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आम्ही त्यांना भेटायला जात होतो. मला भेटायला रवींद्र पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंना आणले होते. मी म्हणालो, याला मी ओळखतो. त्यावेळी ते पाटेकर म्हणाले, यांना जिल्हाध्यक्ष केले पाहिजे. त्यानुसार मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्ष पदी केलेली निवड निश्चितच चुकली नाही याचा मला अभिमान वाटतो. मी त्या काळात महाराष्ट्रात केलेले जिल्हाध्यक्ष अजूनही आहेत. ते त्या पक्षाशी प्रामाणिक आहेत. तो पक्ष सोडायचा नाही. माझ्याकडे यायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मला कोणीही पक्ष सोडलेला आवडत नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्यात आनंदाने रहा. पक्षाने तुम्हाला वैभव दिले, सर्व दिले. मानाचे पद दिले, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली आणि तुम्ही तो पक्ष सोडून जाता. मी जिथे आहे तिथे सुखी आहे. मी नगरला गेलो तर बाबूशेट टायरवाला येतो. सोलापूरला पुरुषोत्तम बर्डे येतो. तसे खुप आहेत. त्यामुळे तुम्ही कार्यकर्ते हेरले पाहिजेत. कार्यकर्ते शोधले पाहिजेत. त्यांना सन्मानाच्या जागा दिल्या पाहिजेत. मात्र तुम्ही पालखीचे भोई शोधतात. स्वतःच्या फायद्याचे लोक निवडतात. त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता. गुणवत्ता पाहून चांगल्या कार्यकरत्याला संधी दिली पाहिजे. तोच खरा नेता असतो. हे बाळासाहेब ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांनीही तेच केले. काल-परवा झालेल्या घटनेचा आम्हाला आनंद नाही, असे त्यांनी सांगितले.

मी स्वतः एसटीने फिरून शिवसेना पक्षाची बांधणी केली आहे. गावोगाव एसटीने जायचो आम्ही. माझ्या आधी शाबीर शेख होते. एवढा उत्तम पक्ष फुटल्यावर वेदना होणारच. आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी तो पक्ष सोडल्यावर ठरविले. कुठल्याही पक्षाचा एकही माणूस फोडायचा नाही. ते आज तागायत आम्ही पाळलं. आमची लोक फोडली. तरी आम्ही काही बोललो नाही. जो स्वतःच्या आईचा झाला नाही तो दुसऱ्याचा काय होऊ शकतो. ज्यांना राज ठाकरेंनी मोठे केले ते आपले झाले नाहीत, असा टोलाही त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांना लगावला.

नाशिकने राज ठाकरेंवर प्रेम केले. त्यांना भरभरून दिले. लोकांनाही आता कळले आहे की, राज ठाकरे यांनी नाशिकचे प्रामाणिकपणे काम केले. मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये. आता लोकांना वाटायला लागले आहे की, हिंदुत्त्वाचा खरा वासदार आला आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी प्रकाश महाजन यांच्यासह मनसेचे नाशिकमधील नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT